राज्यघटनेवर होणाऱ्या आघाताविरुद्ध संघटित व्हा - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन
संगमनेर LIVE | महाकवी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, समाज सुधारक यांना त्रास देणारी धर्माध वृत्ती आजही कार्यरत आहे. हे लोक वेळीच ओळखा. गोरगरिबांनी सर्वसामान्य माणसाला किंमत ही राज्यघटनेमुळे असून राज्यघटनेवर होत असलेल्या आघाताविरुद्ध सर्वानी संघटित होऊन लढा. असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवा, या मागणीचा पुनरुच्चार केला.
संगमनेर बस स्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने १०५ व्या जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाज बांधव आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांची मोठे योगदान राहिले आहे. अनेक हुतात्म्यांनी योगदान देऊन मुंबई मिळवली. मात्र अनेक उद्योग राज्याबाहेर जात असताना मुंबईबाहेर जाते की काय अशी भीती सुद्धा सध्या निर्माण झाली आहे. सर्व संतांचे विचार हे राज्यघटनेमध्ये आहे. ही राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे.
राजकारण हे अपरिहार्य आहे. परंतु प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, आपण कोणत्या विचारांच्या बाजूने आहोत. बहुजनांच्या सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या राज्यघटनेच्या बाजूने प्रत्येकाने राहिले पाहिजे. राज्यघटनेवर सध्या मोठे आघात होत असून या विरुद्ध सर्वानी संघटनेतून आवाज उठवावा. याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही मागणी आपली असून या समाजातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यानी पहिले शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन काम करावे आणि शिक्षणाची ही चळवळ अधिक समृद्ध करून गोरगरिबांच्या जीवनात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा घेऊन आनंद निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. तांबे म्हणाले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजे. त्यांनी ज्या समतेसाठी आवाज उठवला त्या समतेकरता आज पुन्हा आवाज उठवण्याची गरज आहे. लोकशाहीची दररोज पायमल्ली होत असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.