दिग्गज शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना
◻️ कर्जमाफी व शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन
संगमनेर LIVE (छत्रपती संभाजीनगर) | सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक संपन्न झाली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन, शेतकरी कर्जमाफी आणि एमएसपी च्या भावावर २० टक्के हमीभाव याबाबत शासनाने निर्णय घेण्यास करत असलेले विलंब आणि त्याचा शेतकरी व त्याच्या कुटुंबावर होणारे परिणाम यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून, त्याला न्याय मिळून देण्यासाठी आज ही बैठक संपन्न झाली.
याबैठकीत प्रमुख विषयावर चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात आले...
१) दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई मध्ये आंदोलन करण्यात येणार.
२) राज्यात विभागनिहाय संयुक्त परिषद घेण्यात येणार.
३) शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येणार.
४) शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.
५) कर्जमुक्ती,सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव, बोगस खते व बियाणे प्रश्न, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करणे, सर्व कृषीनिविष्ठा जीएसटी मुक्त करणे आणि गाव एकक धरून शेतकरी हिताची पीक विमा योजना व खते बियाणे तपासणीसाठी गावावर टेस्टिंग लॅब स्थापन करणे ई. प्रमुख मागण्यासह निर्णय घेऊन लढा देण्याचा निर्णय झाला.
या प्रमुख निर्णयासह हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असून, आजच्या बैठकीला विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव व इतर शेतकरी संघटना नेते या बैठकीस उपस्थित होते. तसेच राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन द्वारे बैठकीस उपस्थित होते.