स्तुती करणाऱ्या लोकांपासून सावध रहा - महंत रामगिरी महाराज
◻️ उंबरी बाळापूर येथे पारंपरिक श्री संकटेश्वर महादेव भंडारा उत्सव संपन्न
संगमनेर LIVE (आश्वी) | गो-दान, सुवर्णदान, अन्नदान, मतदान, रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरी, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे तुमची स्तुती करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. असे अमृततुल्य मार्गदर्शन श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले असून पुराणातील राजा बळी आणि वामनाचे उदाहरण देऊन त्यांनी स्तुती करणाराचे विधान पटवून दिले.
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे पारंपरिक श्री संकटेश्वर महादेव भंडारा उत्सव मंगलमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी भजनी मंडळ, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेलें पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, ६० कोटी सोन्याची घरे असलेला रावण हा माता सीतेचे अपहरण करण्यासाठी भिकाऱ्याचे सोंग घेऊन गेला होता. त्यामुळे ज्यांच्या त्रीष्णा व्यापक आहेत, तो कितीही श्रीमंत असला तरी दरिद्री असतो. त्यामुळे रावणाला श्रीमंत भिकारी म्हटले जाते. असे बहुमोल मार्गदर्शन करत विठ्ठल नामाचा गजर केला. दरम्यान याप्रसंगी कीर्तन समाप्तीनंतर उपस्थिताना ग्रामस्थांनी महाप्रसादाचे वाटप केले.
महंत रामगिरी महाराज यांनी गावातील यमाई देवस्थान, विठ्ठल मंदिर आणि संकटेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. कीर्तन समाप्तीनंतर त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सुरुनाथ उंबरकर यांच्या घरी भेट दिली. यावेळी उंबरकर कुटुंबातील महिलांनी रामगिरी महाराजांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत पूजन केले.