जनतेन केलेला पराभव मान्य होत नसल्याने त्याचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
◻️ मंत्री विखे पाटील यांची नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टिका
◻️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना
संगमनेर LIVE | विधानसभेच्या पराभवानंतर समोरच्याकडे आता काही शिल्लक नाही. वेगवेगळ्या कारणांनी फक्त महायुतीच्या कार्यकर्त्याना बदनाम करून आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही फक्त महायुती म्हणून एकसंघ राहा तुमच्या प्रयत्नांमुळे विधानसभेला मोठे यश मिळाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला ऐतिहसिक विजय मिळवून देण्यासाठी तयारी सुरू करा. असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. आमदार अमोल खताळ, भाजपाचे श्रीराम गणपुले, अध्यक्ष गुलाबराजे भोसले, श्रीकांत गोमासे, सौ. पायल ताजणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अॅड. शाळीग्राम होडगर, दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, जावेद जहागिरदार, बाबासाहेब कुटे, रामभाऊ राहाणे, आरपीआयचे आशिष शेळके, यांच्यासह तालुक्यातून प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली आभार सभा तसचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यानी आणि तालुक्यातील जनतेन निषेध मोर्चाच्या माध्यमातून समोरच्यांना दिलेले उत्तर यातूनच तालुक्यात महायुतीला तालुक्यात असलेला प्रतिसाद सिध्द झाला असल्याचे सांगितले.
विधानसभेला संघटितपणे महायुतीचे सर्व कार्यकर्त्यानी गावोगावी दहशतीच्या विरोधात केलेल्या संघर्षामुळे आमदा अमोल खताळ यांच्या रूपाने महायुतीला मोठे यश मिळाले. परंतू जनतेन केलेला पराभव त्यांना मान्य होत नाही. तालुक्यात आमदार अमोल खताळ लोकांमध्ये जात आहेत. यापुर्वी तालुक्यात असे चित्र कधी नव्हते. किमान आता त्यांना फिरावेसे तरी वाटत असल्याचा टोला लगावून मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडेचे पाणी आले भोजापूरचा पाणी प्रश्न सुटत आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यामातून भोजापूर प्रकल्पाला मोठा निधी उपलब्ध होईल.
साकूर भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन तयार झाले आहे, योग्यवेळी सांगू असे स्पष्ट करून महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केवळ जनतेत जावून काम करा. एकमेकांमधील हेवेदावे बंद करा. तुमच्यात दुफळी निर्माण कशी होईल याचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला बदनाम करण्यासाठी ते काहीही षडयंत्र रचतील त्यामुळे सावध राहून काम करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी केल्या.
जिल्हा परिषद गट आणि शहरात प्रभागनिहाय बैठका भेटी सुरू करा. निवडणुका दिवाळी नंतर केव्हाही जाहीर होवू शकतील त्यामुळे उमेदवार कोण असेल यापेक्षा महायुतीचा उमेदवार आपल्याला विजयी करायचा आहे हे लक्षात ठेवून काम सूरू करण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले.
आमदार अमोल खताळ आपल्या भाषणात म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून मागील आठ महिन्यात मोठा निधी तालुक्याला मिळवला. सर्वाना मी आपल्यातला वाटतो. सामान्य माणसाच्या सुख दुखात जातो म्हणून जनतेची सहानुभूती महायुतीला मिळत आहे. काहीना हे सहन होत नाही त्यामुळेच महायुतीला बदनाम करण्याचे काम होत आहे. माझ्यावर हल्ला झाला त्याची प्रतिक्रीया तालुक्याने दिली. विधानसभेला असेच वातावरण त्यांनी केले. महायुतीच्या कार्यकर्त्याना धमकावण्याचे प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे. आम्हाला विकास करायचा आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून औद्यगिक वसाहत आपण मंजूर करून आणणारच याची ग्वाही दिली.
दरम्यान याप्रसंगी अॅड. शाळीग्राम होडगर, श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार, विठ्ठलराव घोरपडे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना आणि मार्गदर्शन आपल्या भाषणातून केले.