“मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा” - ॲड. प्रकाश आंबेडकर

संगमनेर Live
0
“मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा” - ॲड. प्रकाश आंबेडकर

◻️धम्म मेळाव्यातून ओबीसी समाजाला सावध होण्याचे आंबेडकरांचे आवाहन 

संगमनेर LIVE (अकोला) | धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. मोदींना टाटा बाय बाय करून देशाला वाचवा असे सांगून ओबीसी समाजाने वेळीच सावध होण्याचा इशारा ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे.

ॲड. आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप-आरएसएसवर हल्ला चढवला. ओबीसींचा घात आरएसएस-भाजपने केला आहे. एवढं तरी ओबीसींनी डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल, असे ते म्हणाले. स्थानिक पातळीवर ओबीसी नेतृत्वाला संधी देणारे आरक्षण आता हातातून जाण्याची शक्यता आहे, असे सांगत ओबीसींसाठी ही धोक्याची घंटा आहे असे सांगून ते म्हणाले, “नुसते राजकीय आरक्षण जाणार नाही, तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाईल. त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावे."

'विश्वगुरु' मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना ॲड. आंबेडकर म्हणाले, स्वतःला विश्वगुरु म्हणणारे देशाच्या संकटात भर घालत आहेत. जगभरात भारतीयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. जगभरातील सुमारे २० कोटी भारतीय देशात परत आल्यास इथल्या व्यवस्थेवर मोठा ताण पडेल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींच्या परदेशातील वागणुकीवर बोट ठेवत ते म्हणाले, स्वतःला विश्वगुरु म्हणणारे नरेंद्र मोदी यांना परदेशात जगातील देश कशा पद्धतीने वागणूक देतो याचे हजारो व्हिडीओ यूट्युबवर आहेत. इतका अपमान नरेंद्र मोदींचा जगभरातील देश करत आहेत.

धम्म मेळाव्यात बोलताना त्यांनी देशाच्या सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले की, भारताचे सैन्य लढायला तयार आहे, पण लढणार कुठून? पाकिस्तानला येणारी युद्ध सामग्री ही जगभरातील देशांकडून येत आहे. पाकिस्तानकडे बाहेरची हत्यारे येत आहेत.

ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्याचे आवाहन केले. ही परिस्थिती बदलायची असेल, तर मोदीला टाटा, बाय बाय करा. त्याचं आणि जगाचं भांडण आहे ते भारतीयाचं नाही, असे ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले, एकही मित्र भारताचा राहिलेला नाही, अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली. 

मोदी हे केवळ आपला 'इगो' जपण्यासाठी काम करत आहेत. देश महत्वाचा आहे की नाही? हे ठरवा आणि मोदींना टाटा, बाय बाय करून देशाला वाचवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 

दरम्यान अकोला पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेळाव्यामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !