जयहिंद आश्रम शाळेमुळे विद्यार्थ्याना मोठी संधी - बाळासाहेब थोरात
◻️ कोळवाडे येथे नवीन आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह व ट्रेनिंग सेंटर इमारतीची भूमिपूजन
संगमनेर LIVE | आदिवासी समाजातील विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरता थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी कोळवाडे येथे आश्रम शाळा सुरू केली. आश्रम शाळा राज्यातील इतर आश्रम शाळांसाठी मॉडेल ठरली असून जयहिंद आदिवासी आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थी आज देशात आणि विदेशात चांगल्या पदावर काम करत असल्याने या विद्यार्थ्याना मोठी संधी मिळाली आहे. याचबरोबर नव्याने होत असलेल्या वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटर मुळे स्थानिक विद्यार्थ्याना चांगली संधी मिळेल. असा विश्वास माजी मंत्री आणि कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
कोळवाडे येथे जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा वर्धापन दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व फादर रॉबर्ट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. याप्रसंगी आदिवासी विद्यार्थ्यासाठी नवीन वस्तीगृह व ट्रेनिंग सेंटर इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आदिवासी व गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा व्हावी याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कोळवाडे येथे आदिवासी आश्रम शाळा सुरू केली. या आश्रम शाळेतील ६१० विद्यार्थी राज्यभरात विविध मोठ्या पदांवर कार्यरत असून हे संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. आदिवासी व गरीब समाजातील पालकांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे अत्यंत चांगल्या सुविधा या शाळेमध्ये असून नव्याने होत असलेल्या ट्रेनिंग सेंटर मधून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रणाली मिळणार आहे. याचबरोबर दर्जेदार असे वस्तीगृह याठिकाणी होणार असल्याने विद्यार्थ्याची राहण्याची मोठी सोय होणार आहे.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद आदिवासी आश्रम शाळा ही राज्यातील आश्रम शाळांसाठी मॉडेल ठरली आहे. गुणवत्ता हे या शाळेचे वैशिष्ट्य असून विद्यार्थ्याना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी यापुढेही शाळा प्रयत्न करेल असे ते म्हणाले. तर, फादर रॉबर्ट म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ग्रामीण विकासाचा मंत्र घेऊन आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आपण काम करत आहोत
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. यावेळी शालेय समितीचे सदस्य ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.