साखर कारखाण्याना उपपदार्थ निर्मितीसाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार
◻️ केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची ग्वाही
◻️ लोणी येथे पद्मश्री आणि पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
संगमनेर LIVE (लोणी) | सहकारी साखर कारखानदारीला बहुउद्देशीय चेहरा मिळवून देण्यासाठी उपपदार्थ निर्मितीला अधिक प्रोत्साहन द्यावे लागेल. ऊसाबरोबरच मका आणि तांदुळापासून इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने धोरण घेतले असून, उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभे करणाऱ्या कारखान्यांना केंद्र सरकार अर्थसहाय्य करण्यास तयार असल्याची ग्वाही केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पुर्वी प्रवरानगर येथील डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार आणि सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी पद्मश्रींच्या कार्याचा गौरव करुन, भारताच्या सहकार चळवळीतले ते आद्य पुरुष होते. डॉ. विखे पाटील यांच्या सहकार्याने धनंजय गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीचा इतिहास रचला. एक सहकारी साखर कारखाना निर्माण झाल्याने त्याचा आदर्श घेवून गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्येही सहकार चळवळ विस्तारली गेली.
या माध्यमातून तो भाग समृध्द झाला. व्यापाऱ्यांना फायदा होण्याऐवजी सहकारी साखर कारखानदारीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जावू लागला. सहकार चळवळीची ही किमया सामाजिक विकासासाठी संमृध्द ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून अर्थकारण अधिक बळकट करायचे असेल तर, कारखान्यांना उपपदार्थ निर्मितीला चालना द्यावी लागेल असे स्पष्ट करुन, अमित शाह म्हणाले की, ऊसापासून इथेनॉल निर्मिती सुरु करण्यात आली. परंतू आता ऊसा बरोबरच तांदुळापासून इथेनॉल निर्मितीचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. एनसीडीसीच्या माध्यमातून अशा प्रकल्पांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करण्यास तयार असुन, इथेनॉलवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णयही मोदी सरकारने घेतला असल्याची माहीती त्यांनी आपल्या भाषणात दिली.
सहकाराची पंढरी म्हणून लोणी प्रवरानगर भागाकडे पाहीले जाते असा गौरवपुर्ण उल्लेख करुन, शाह म्हणाले की, पद्मश्री विखे पाटील यांनी संपूर्ण जीवन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व्यतीत केले. त्यांचाच वारसा पुढे चालवून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार मजबुत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ग्रामीण विकासाची नवी परंपरा या माध्यमातून सुरु केली. सात वेळा या भागातून लोकसभेमध्ये निवडून जावून संसदेमध्ये चांगले काम त्यांनी केले असल्याची आठवण सांगून गुजरात मधील अडचणीत आलेल्या बॅकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांची मोठी मदत झाल्यामुळेच आज गुजरात मधील २२५ बॅकांना त्यांनी जीवदान दिले.
राज्यात झालेल्या अतिवृष्ठीचा उल्लेख करुन, शाह म्हणाले की, ६० लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती पीकांचे नुकसान झाल्याची माहीती आमच्याकडे आली आहे. यापुर्वी झालेल्या अतिवृष्ठीत ३ हजार १३८ कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. यंदा झालेल्या अतिवृष्ठीतही मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने आमच्याकडे पाठवावा, आम्ही मदत करायला तयार आहोत असे आश्वासन देवून राज्य सरकारने शेतकऱ्यांना या संकटात २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत आणि ३५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे, कर्जाची वसूलीही थांबविली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री म्हणजे त्रिमुर्ती आहेत, ते बनिया नाहीत तर पक्के आहेत. मला आज लोणीत बोलावून शेतकऱ्यांच्या मदतीचा शब्द घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पद्मश्री आणि पद्मभूषण यांच्या पुतळ्याचे अनावरण म्हणजे एक प्रकारचे पद्म स्मरण असल्याचे सांगून सहकार चळवळीची मुहूतमेढ रोवून शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण करण्याचे आणि त्याला औद्योगिक चेहरा मिळवून देण्याचे काम केले आहे. पद्मश्री हे नाडी परिक्षण करायचे त्यांनी समाजाची नाडी अचुकपणे ओळखून समाजाचे स्वास्थ ओळखले. याच विचाराने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार मोठा केला. पाण्याची चळवळ सुरु करुन, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न दाखविले, त्यांचे पुर्णत्वास जात असलेले स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दिली आहे. येणाऱ्या ५ ते ७ वर्षात उल्हास खोऱ्यातील ५४ टिएमसी पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवून दुष्काळाला भुतकाळ बनविण्याचे काम आम्ही करीत आहोत.
प्रवरा उद्योग समुहाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल अभिनंदन करुन, मुख्यमंत्री म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांनी प्रत्येक शेतकऱ्याकडून ५ रुपये द्यावेत असा निर्णय घेतला. परंतू शेतक-यांकडून वसुली करीत असल्याचा आरोप झाला. परंतू हे ५ रुपये घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या एफआरपीला कोणताही धक्का लागणार नाही. कारखान्यांच्या नफ्यातून हे पैसे आम्ही घेणार आहोत. काही कारखान्यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. परंतू विरोध करणा-या कारखाने कोणते आहेत हे मला माहीती आहे. काटा मारणारे कारखाने मी शोधून ठेवले आहेत असा गर्भित इशारा देवून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या संकटात केंद्र सरकारने आम्हाला मदत करावी अशी विनंती आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सहकाराचे जाळे राज्यात खोलवर रुजले आहे. यामागे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची प्रेरणा असून, त्यांच्या विचारानेच केंद्र आणि राज्य सरकारने सहकारातून संमृध्दीचा संकल्प केला आहे. सहकार क्षेत्राच्या पाठीमागे अमित शाह भक्कमपणे उभे असून, राज्यातही त्यांनी भाकरी फिरविण्याचे काम केले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी सहकार चळवळीचे योगदान महत्वपूर्ण राहील. कारण केंद्र सरकार सहकार चळवळीसाठी घेत असलेल्या निर्णयाचा मोठा दिलासा साखर कारखानदारीला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आपल्या भाषणात पद्मश्रींच्या कार्याचा गौरवपुर्ण उल्लेख करुन, सहकार चळवळ सुरु करणाऱ्या पद्मश्रींच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले सहकार मंत्री असलेल्या शाह साहेबांच्या हस्ते होणे हा एक अद्भूद योग आहे. ग्रामीण भारताच्या दृष्टीने पद्मश्रींचे व्यक्तिमत्व हे मानबिंदु होते. त्यांनी रुजविलेली सहकार चववळ विखे पाटील परिवाराची चौथी पीढी पुढे घेवून जात असल्याचे समाधान आहे. या भागात लक्ष्मी बरोबरच सरस्वतीही नांदत आहे. सहकारी साखर कारखानदारीच्या स्थैर्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारुन पुढे जावे लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी करुन, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे सहकाराच्या भूमित दुसऱ्यांदा येणे हा आमच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यशस्वी केलेले ऑपरेशन सिंदुर आणि त्यानंतर दहशतवाद आणि अर्बन नक्षलवादाच्या विरोधात सुरु केलेल्या लढाईला बळ म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून चांदीची गदा भेट देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना राज्याच्या विकासाचा मंगल कलश आणि ग्रामीण महाराष्ट्राचे प्रतिबिंब म्हणून बैलगाडीची भेट दिली.