आगामी निवडणुकीत शतप्रतिशत महायुतीच्या सत्तेसाठी कटीबद्ध व्हा!
◻️ जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
◻️ आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्त्याचा मेळावा संपन्न
संगमनेर LIVE | आपल्या सर्वाच्या योगदानामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. लोकांसाठी काम करणारे हे सरकार आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून महायुती सरकारने केवळ घोषणा नव्हे तर मदत देण्याची अंमलबजावणी केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतही तेवढ्याच जोमाने काम करुन, महायुतीला विजयी करण्यासाठी कटीबध्द होण्याचे अवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्त्याचा मेळावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील विधानसभा निवडणूकीत आपण सर्वानी दिलेल्या पाठबळामुळेच शिर्डी विधानसभा मतदार संघात ऐतिहासिक विजय मला मिळाला. आपल्या सर्वाच्या योगदानामुळेच राज्यातही महायुती सरकार सत्तेवर आले. महाराष्ट्र राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळत आहे. नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठलाही विलंब न करता राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.
तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ कोटी २० लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली असून, कालच्या मंत्रीमंडळ बैठकीतही ११ हजार कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, शिर्डी मतदार संघातही विकासाची प्रक्रीया कुठेही कमी झालेली नाही. ग्रामस्थ आणि कार्यकर्ते सुचवतील त्याच पदध्दतीने विकास कामे होत आहेत.
निळवंडे उजव्या कालव्याची प्रतिक्षा अनेक वर्षाची होती. या प्रश्नाची सोडवणूक करुन, शेतकऱ्यांना पाणी देता आल्याचे मोठे समाधान व्यक्त करुन, प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतणीकरणासाठी दिडशे कोटी रुपयांची उपलब्धता करुन दिली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. शिर्डी मतदार संघातील युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची सुरुवात गतीने होत असून, अनेक उद्योजक त्या ठिकाणी येवून आता उद्योगाची उभारणी करु लागले आहेत. अतिशय कमी कालावधीत शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये या भागातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना शाळीग्राम होडगर यांनी गट आणि गणाचे नियोजन कार्यकर्त्यानी आत्तापासूनच सुरु करण्याचे आवाहन करुन, नागरीकांच्या भेटीगाठी घेण्यासाठीही गावपातळीवर कार्यकर्त्यानी पुढाकार घेण्याचे सुचित केले. संतोष रोहोम यांनी आपल्या भाषणात नामदार विखे पाटील जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही आम्ही घेवू. त्यांच्या नेतृत्वाखालीच संगमनेर तालुक्यात परिवर्तन होवू शकले आहे. अगामी निवडणूकीतही हे परिवर्तन अधिक मोठे होईल असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान या मेळाव्यात संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, वाघापुरचे माजी उपसरपंच विनोद घोलप, अमृत दुध संस्थेचे संचालक रामभाऊ शिंदे, वाघापुर सोसायटीचे संचालक साहेबराव शिंदे, साईराम राहाणे, शारदा पतसंस्थेचे नानासाहेब शिंदे, दिपक पानसरे, बाबासाहेब शिंदे, संदिप शिंदे, जोर्वे युवक कॉग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ बलसाने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वाचे मंत्री विखे पाटील यांनी स्वागत करुन, अभिनंदन केले.