सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ श्री साईबाबा संस्थानच्या एम्प्लॉईज सोसायटी तर्फे दीवाळीनिमित्त सभासदांंना भेट
संगमनेर LIVE (शिर्डी) | शिर्डी येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे सामाजिक बांधिलकी जपत दर वर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त सभासदांंना भेट देण्यात आली. त्याचा वितरण शुभारंभ उपक्रमाचा शुभारंभ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी कमलाकर कोते, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार, उपाध्यक्ष पोपट कोते, संचालक मंडळाचे सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विविध स्थानिक आणि राजकीय विषयांवरही थेट भाष्य करताना म्हटले, विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षात विखे पाटील परिवाराच्या विरोधात अनेक प्रयत्न केले, पण आमदारपद आजही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडेच आहे. हा बाबांचा निर्णय होता आणि बाबांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय. असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले, बाबांना सगळं माहीत असतं. ते परिस्थिती पाहून निर्णय घेतात. अध्यक्ष कोण झाला हे गौण आहे, पण शिर्डीचा विकास हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच करणार आहेत यात शंका नाही.
कर्मचारी विषयावर बोलताना डॉ. विखे म्हणाले, ५९८ कर्मचाऱ्यांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. दुर्दैवाने याचिका करणारे आपल्यातीलच काही कर्मचारी आहेत. आपल्याला समजून घ्यायचं आहे की कधी कधी शत्रू बाहेर नसतो घरातच असतो. पण मी या कर्मचाऱ्यांसोबत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे असा विश्वास व्यक्त केला.
देशाचे गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या अलीकडील शिर्डी दौऱ्याचा उल्लेख करताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, देशाचे गृहमंत्री एका दिवशी चार ठिकाणी गाडीतून उतरले, दर्शन घेतले, सभा घेतल्या, जेवण केले ही गोष्ट सगळ्यांच्या नशिबात नसते. ही आमची पुण्याई आहे. जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद आमच्यावर आहे, तोपर्यंत कुणीही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही.
शिर्डीच्या गोरगरीब जनतेने आम्हाला कधीच सोडलं नाही. आम्ही त्यांना बंगले दिले नाहीत, नोकऱ्या दिल्या नाहीत, पण त्यांनी आमच्यावर अपार विश्वास ठेवला. जोपर्यंत हे लोक आमच्यासोबत आहेत, तोपर्यंत नामदार साहेबांना कोणीही हरवू शकत नाही ही काळी दगडावरची पांढरी रेघ असल्याचे म्हणत सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.