“बच्चू कडू माझे जुने मित्रचं; वक्तव्याने मैत्री अधिक दृढ होईल”- विखे पाटील
◻️ बच्चू कडूंच्या टीकेनतंर कार्यकर्त्याना 'शांततेचे' आवाहन
◻️ विखे पाटलांच्या सुरक्षा व्यवस्थेत केली वाढ
संगमनेर LIVE (नेवासा) | माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याने आमची मैत्री अधिक दृढ होईल. मला यावर कोणतेही भाष्य करायचे नाही. मी केलेला खुलासा त्यांनी पाहावा. आशी प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, बच्चू कडू माझे जुने मित्र आहेत. अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हापासून एकमेकांना आम्ही ओळखतो. त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर फार काही बोलावे असे नाही. मला काय खुलासा करायचा तो मी केला आहे.
नेवासा येथे महायुतीचा मेळावा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रभाकर शिंदे, अब्दुल शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नेवासा तालुक्यात विधानसभा निवडणुकीत घडवलेल्या परिवर्तनाबद्दल कार्यकर्त्याचे अभिनंदन करून आशीच एकजूट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दाखविण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी औद्यगिक वसाहत निर्माण करणे हेच ध्येय असल्याचे सांगून आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही आशी ग्वाही देवून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना १२० कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून यापैकी ७० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. सर्व अटी काढल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, आशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, विखे समर्थक कार्यकर्त्यानी कडू यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र कार्यकर्त्यानी शांतता ठेवण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.