‘बिबट्यामुक्त तालुका’ मागणीसाठी उद्या ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन
◻️ नरभक्षक बिबट्यांच्या दहशतीविरुद्ध संगमनेरचा एल्गार!
संगमनेर LIVE | बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी, नरभक्षक बिबट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी सरकार आणि वन विभागाच्या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. ‘बिबट्या हटाव’ या निर्णायक लढ्यासाठी उद्या सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यामध्ये काही बिबटे नरभक्षक बनले असून त्यांनी अनेक नागरिकांवर हल्ले केले आहेत. जवळे कडलग येथील लहानगा सिद्धेश याला याच हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. सातत्याने होणारे हल्ले आणि नागरिकांमध्ये, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये निर्माण झालेली भीती यामुळे तालुक्यात मोठी दहशत पसरली आहे.
बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वेळोवेळी मागणी करूनही शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे संगमनेर तालुका युवक कॉग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी या जन आक्रोश आंदोलनाची सविस्तर माहिती दिली.
जनतेच्या सुरक्षेचा आणि बिबट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताचा प्रश्न मार्गी लागावा याकरता हे आंदोलन छेडण्यात येत आहे. उद्या सोमवारी सकाळी १० वाजता संगमनेर बस स्थानक ते प्रांत कार्यालय येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बिबट्या हटाव आंदोलनात संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक, महिला, युवक, आणि शेतकऱ्यांना या निर्णायक लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन. तसेच बिबट्यांच्या वाढत्या दहशतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या आंदोलनात सामील होऊन आपल्या सुरक्षित भविष्यासाठी आवाज उठवा. असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात आणि जन आक्रोश समितीने केले आहे.