युवकांनी मोबाईलचा मोह टाळून वाचन संस्कृती जोपासावी - डॉ. जयश्रीताई थोरात
◻️ कोकणगावच्या शैक्षणिक वैभवात नवी भर; अद्ययावत अभ्यासिकेचे भूमिपूजन संपन्न!
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने संगमनेर तालुका हे शिक्षणाचे प्रगत केंद्र म्हणून ओळखले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी स्पर्धेत टिकून राहावे, या उद्देशाने तालुक्यात ९ अद्ययावत अभ्यासिका उभारण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कोकणगाव येथे भव्य अभ्यासिकेचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे स्थानिक विद्यार्थ्याची मोठी सोय होणार असल्याचे प्रतिपादन युवक कॉग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले.
कोकणगाव येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून ‘ग्रामविकास कार्यक्रम २५१५' अंतर्गत या अभ्यासिकेचे काम हाती घेण्यात आले आहे.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा नेहमीच आपला परिवार मानला आहे. गेल्या ४० वर्षाच्या प्रदीर्घ काळात त्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता अविरत काम केले असून, त्यांच्या याच कष्टातून निळवंडे धरणाचे कालवे आणि इतर अनेक ऐतिहासिक विकासकामे मार्गी लागली आहेत. सहकार, शेती, ग्रामीण विकास आणि दुग्धव्यवसाय या चतुःसूत्रीतून त्यांनी तालुक्याला विकासाच्या शिखरावर नेले आहे.
आज राज्यामध्ये संगमनेरचा जो लौकिक आहे, तो साहेबांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शहराप्रमाणेच अद्ययावत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने त्यांनी या नऊ अभ्यासिका मंजूर केल्या आहेत. “वाचाल तर वाचाल“ ही संकल्पना खऱ्या अर्थाने रुजवण्यासाठी युवकांनी मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करून वाचन संस्कृतीकडे वळले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरपंच सौ. आशाताई जोंधळे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या की, “ज्या लोकांनी गेल्या एका वर्षात काहीच ठोस काम केले नाही, ते आज ४० वर्षाच्या विकासकामांचा हिशोब विचारत आहेत. आपण ज्या रस्त्यावर उभे आहात आणि ज्या बस स्थानकावर मागील वर्षभरापासून फ्लेक्स लावले जात आहेत, ते सर्व लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीच उभे केले आहे. संगमनेरच्या नवीन लोकप्रतिनिधींनी हा तालुका बाहेरच्या लोकांच्या हातात दिल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला. मंत्री येतात आणि एमआयडीसी, नदी, पाणी अशा विविध घोषणा देऊन जातात, मात्र प्रत्यक्षात त्या केवळ भूलथापा आहेत. अशा खोट्या आश्वासनांना संगमनेरचा युवक कधीही बळी पडणार नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान या कार्यक्रमासाठी शिवाजी जोंधळे, लक्ष्मण जोंधळे, हनुमंत जोंधळे, दिलीप जोंधळे, सुखदेव जोंधळे, भीमाशंकर जोंधळे, विठ्ठल पानसरे, शिवाजी वामन, जालिंदर जोंधळे, सुभाष ढगे, भाऊसाहेब पानसरे, भाऊसाहेब जोंधळे, मुख्याध्यापिका श्रीमती राहणे, आदित्य पवार, दीपक जोंधळे, योगेश जोंधळे, महेश जोंधळे, संदीप जोंधळे, विकी पारधी, चंद्रकांत वायकर तसेच निझर्नेश्वर विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.