जवळे कडलग येथे घरासमोर खेळणाऱ्या सिद्धेशचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
◻️ आजीच्या डोळ्यांदेखत बिबट्याने सहा वर्षाच्या नातवाला गिणी गवतात ओढल
संगमनेर LIVE | बिबट्यांच्या वाढत्या वावराने संगमनेर तालुक्यात मोठी दहशत निर्माण झाली असून, शनिवारी सायंकाळी जवळे कडलग येथे बिबट्याने सहा वर्षाच्या चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला सिद्धेश सुरज कडलग (वय ६, रा. जवळे कडलग) याचा जागीच मृत्यू झाला.
गळ्यावर आणि डोक्यावर बिबट्याचे दात लागल्याने सिद्धेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जवळे कडलग परिसरावर शोककळा पसरली असून, बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जवळे कडलग येथील कडलग वस्तीवर सिद्धेशचे कुटुंब शेती आणि दुग्धव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करते. नेहमीप्रमाणे सायंकाळी घरगुती कामे सुरू असताना चिमुकला सिद्धेश घराच्या परिसरात खेळत होता. नेमकी याच वेळी घराशेजारी असलेल्या गिणी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याची नजर या निष्पाप चिमुकल्यावर पडली. सिद्धेशला एकटे पाहून बिबट्याने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यावर झेप घेतली.
बिबट्याने चिमुकल्यां सिद्धेशला तोंडात धरून गिणी गवतात ओढून नेले. हा भीषण आणि थरारक प्रकार सिद्धेशच्या आजीने पाहिला आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता तातडीने आरडाओरडा सुरू केला. आजीचा तो आक्रोश ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली आणि ‘बिबट्या! बिबट्या!’ अशी ओरड करत गिनी गवताकडे मोठी गर्दी जमा झाली.
जनतेच्या या धाडसी प्रतिसादाने बिबट्या घाबरला आणि त्याने चिमुरड्याला सोडून पळ काढला. ग्रामस्थांनी तात्काळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे जवळे कडलग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून आता शहरातील उपनगरांमध्येही बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे.
दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तर या घटनेनंतर गावातील विविध ठिकाणचे बिबट्याच्या वावराचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहे.
दरम्यान लहान मुलांवर होत असलेल्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे पालकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी, त्यांना जेरबंद करण्यासाठी आणि मानवी वस्तीतून दूर ठेवण्यासाठी वन विभागाने त्वरित कठोर उपाययोजना करावी, अशी आर्त विनवणी आता परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिक करत आहेत.