नाशिक - पुणे रेल्वेमार्गासाठी अधिवेशनात ठाम भूमिका घेणार - आमदार अमोल खताळ
◻️ वेळप्रसंगी जनतेच्या हितासाठी जनआंदोलन उभारण्याची ग्वाही
संगमनेर LIVE | नाशिक - पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न जोरदारपणे मांडणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. रेल्वेमार्गाच्या मुद्द्यावरून राजकारण करून ‘आपली पोळी भाजून घेण्याचा’ प्रयत्न करणाऱ्यांवर त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले.
आमदार अमोल खताळ आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, “नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरवरूनच व्हावा, ही आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे. पावसाळी अधिवेशनातही आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्र्यांनी जीएमआरडीचा तांत्रिक अहवाल सादर करत मार्ग बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र आजचे तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की पर्यायी ट्रॅक तयार करून मार्ग बदलणे पूर्णतः शक्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमची बांधिलकी जनतेशी आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हायला हवा, याबाबत आमची भूमिका आजही ठाम आहे.”
या प्रकल्पात राज्य सरकारचा ५० टक्के वाटा असल्याने संगमनेरवर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वेळ आली तर महायुतीतर्फे जनतेच्या हितासाठी राजकारणविरहित जनआंदोलन उभारले जाईल,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर निशाणा साधताना आमदार खताळ म्हणाले, “जीएमआरडीचे कारण देत हा रेल्वेमार्ग बदलणार असल्याची संपूर्ण माहिती पदवीधर आमदारांना आधीपासून होती. तरीही त्यांनी ही माहिती जनतेपासून लपवून का ठेवली? असा प्रश्न उपस्थित करत केवळ, राजकारणासाठी विकासाचा बळी दिला गेला काय? असा सवाल विचारला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या भूमिकेवरही आमदार खताळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत त्यांनी ठाम भूमिका घेणे आवश्यक होते, मात्र त्यांनी लोकसभेत या विषयावर कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे.