बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा यशस्वी!
◻️ संगमनेर तालुक्यातील १५ किमी रस्त्यांच्या कामांना ‘मुख्यमंत्री ग्रामसडक’ अंतर्गत पुन्हा प्रशासकीय मंजुरी
संगमनेर LIVE | मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील सुमारे ३०.५७० किलोमीटर लांबीच्या आठ रस्त्यांच्या कामांना यापूर्वी मिळालेली मंजुरी रद्द करण्यात आली होती. मात्र, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने यातील सुमारे १५ किलोमीटर लांबीच्या चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना नव्याने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात ४ ऑक्टोबर २०२४ रोजी संगमनेर तालुक्यातील एकूण आठ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. तथापि, ७ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाने अचानक ही सर्व कामे रद्द केली.
या निर्णयानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी रस्त्यांची निकड लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर, शासनाने नव्याने आदेश काढत पहिल्या टप्प्यात चार रस्त्यांच्या कामांना पुन्हा मान्यता दिली आहे. उर्वरित रस्त्यांसाठीही पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे.
यामध्ये डिग्रस - रणखांबवाडी, मिर्झापूर - धांदरफळ खुर्द, साकुर - बिरेवाडी, तासकरवाडी - खंडेरायवाडी या चार रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
यामुळे आमदार सत्यजीत तांबे यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “मंजूर झालेली कामे रद्द करणे योग्य नव्हते. कामे रद्द झाल्यानंतर आम्ही त्वरित पाठपुरावा केला. ग्रामविकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार. उर्वरित रस्त्यांच्या कामांनाही लवकरात लवकर मंजुरी मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील.” असे म्हटले.