अमृता फडणवीसांची बदनामी खपवून घेणार नाही - सौ. अनुजा साळवी
◻️ सौ. साळवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला पदाधिकारी देणार निवेदन
संगमनेर LIVE (मुंबई) | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या तथाकथित गायिका अंजली भारती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी परिषद मुंबईच्या महिला अध्यक्षा सौ. अनुजा साळवी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात भाजप महिला पदाधिकारी आणि कृषी परिषदेच्या वतीने लवकरच पोलीस स्टेशनला अधिकृत निवेदन देऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
अंजली भारती यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभरातील महिला कार्यकर्त्यामध्ये संतापाची लाट उसळली असून अशा प्रकारची वक्तव्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नसल्याचे मत सौ. अनुजा साळवी यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केवळ सत्ताधारीच नव्हे, तर सर्वपक्षीय महिला नेत्यांनी याचा निषेध केला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
सौ. अनुजा साळवी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, राजकारणात टीका-टिप्पणी करणे ही एक वेगळी बाब आहे, परंतु एखाद्या महिलेच्या व्यक्तिमत्वावर चिखलफेक करणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळेच अंजली भारती यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, असे नमूद केले.
तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी भाजप महिला आघाडी आणि कृषी परिषदेचे शिष्टमंडळ लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असून, जोपर्यत ठोस कारवाई होत नाही तोपर्यत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे.