राज्यातील महायुती सरकारमध्ये सध्या गोंधळाची स्थिती - बाळासाहेब थोरात
◻️ विदर्भातील शेतकरी संवाद दौऱ्यात सरकारवर घणाघाती टीका; सरसकट कर्जमाफीची मागणी
संगमनेर LIVE (अमरावती) | कॉग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. “राज्यातील महायुती सरकारमध्ये सध्या प्रचंड गोंधळाची स्थिती असून, भाजपच्या सत्ताकारणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे मोठे नुकसान होत आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
विदर्भातील अकोट, शेगाव, जळगाव जामोद आणि अकोला परिसरात कार्यकर्त्याशी संवाद साधताना थोरात यांनी शेती प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. “भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. सध्या शेतकरी संकटात असून सरकारने तातडीने राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी,” अशी आग्रही मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.
जळगाव जामोद मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘सातपुडा कृषी प्रदर्शनाचे’ उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. १० एकर परिसरातील या भव्य प्रदर्शनाचे कौतुक करताना ते म्हणाले की, “अशा प्रदर्शनांमधून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, वनौषधी, फुलशेती आणि आधुनिक साधनांची माहिती मिळते, जी बदलाच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.” असल्याचे सांगितले.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना थोरात यांनी भाजपवर तीव्र शब्दात निशाणा साधला. “भाजपने सत्तेसाठी खेळलेल्या खेळींमुळे राज्याच्या राजकारणात गटतट वाढले आहेत. ही स्थिती महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी असून, असे राजकारण राज्यासाठी दुर्दैवी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.