सिस्पे घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीच्या नुसत्या घोषणेनेच काहींची धाबे दणाणले
◻️ पारनेर येथे राधाकृष्ण विखे पाटलांची जोरदार फटकेबाजी
संगमनेर LIVE (पारनेर) | सिस्पे घोटाळ्याची सीबीआय चौकशीची नुसती घोषणा झाली तर काहींचे खुलासे सुरू झाले. तुमचे कोणी नावच घेतले नाही, मग एवढे गडबडता का? असा सवाल करीत जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
पारनेर तालुका खरेदी विक्री संघाने सुरू केलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ मंत्री डाॅ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ घेवून मंत्री विखे पाटील यांनी व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांना सामान्य कार्यकर्त्याना आधार देण्यासाठी तुम्ही एकत्र राहा असा सल्ला देवून तालुक्याच्या अस्मितेसाठी तुम्हाला यापुढे काम करावे लागणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
तालुक्यात सध्या काय सुरू हे मी सांगण्याची गरज नाही. लोकच मला आता माहीती सांगत आहेत. याचा अर्थ सामान्य माणूस मोकळा झाला आहे. कोणतीही दहशत राहीलेली नाही. सिस्पे घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेने अनेकजण गोंधळले आपोआप खुलासे बाहेर येवू लागले. पण मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. कोणाचे नावच घेतले नाही तर काहीजण एवढे गडबडले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोणत्याही परिस्थितीत तालुका आपल्याला दुष्काळमुक्त करायचा आहे. जे स्वप्न लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहीले होते ते पूर्ण करायचे आहे. साकळाई योजनेच्या कामाला सर्व मंजूरी मिळाल्या आहेत. कुकडी प्रकल्पात अधिकचे पाणी निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. डिंबे ते माणिकडोह बोगद्याच्या कामाबरोबरच तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे काम विभागाने सुरू केल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कोणीही असतील तुम्हाला एकत्रित काम करून शतप्रतिशत महायुती विजयी करण्यासाठी काम करावे लागेल. राज्य सरकार तुमच्या सोबत असताना कोणाच्या दबावाला घाबरता. तालुक्याची राजकीय परीस्थीती खूप बदलली आहे. सुपा औद्यगिक वसाहती मध्ये लक्ष घातल्यामुळेच स्थानिक युवकांना नौकरीच्या संधी मिळू लागल्या याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी योजनांची अंमलबजावणी यश्सवीपणे सुरू असून राज्यात ५६३ केंद्र सुरू असून १ हजार १११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. अहिल्यानगर जिल्हयात ४७ केंद्राच्या माध्यमातून खरेदी सुरू असल्याची माहीती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कार्यक्रमास विश्वनाथ कोरडे, राहूल शिंदे, अशोक सावंत, सुजित झावरे, दिलीप दाते, गणेश शेळके, बाबासाहेब तांबे, विजय औटी, दिनेश बाबर, चेअरमन दत्ता कोरडे यांच्यासह सर्व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.