भाषा, साहित्य आणि वाणिज्य या त्रिवेणी संगमाची गरज - सौ. धनश्रीताई विखे
◻️ राहाता महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उध्दघाटन
संगमनेर LIVE (राहाता) | “भाषा आणि साहित्य ही केवळ संवादाची साधने नसून ती समाजाच्या संस्कृतीची आणि मूल्यांची ओळख आहेत. तर दुसरीकडे वाणिज्य क्षेत्रातील नव्या संधी देशाच्या आर्थिक विकासाला गती देतात. या तिन्ही घटकांचा समन्वय साधणाऱ्या अशा आंतरराष्ट्रीय परिषदांतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना जागतिक स्तरावर विचार करण्याची प्रेरणा मिळेल,” असे प्रतिपादन सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
राहाता येथील शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूटच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR), नवी दिल्ली यांच्या सहकार्याने मराठी, इंग्रजी, हिंदी व वाणिज्य विभागांनी संयुक्तपणे ‘भाषा, साहित्य आणि वाणिज्य : उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सांस्कृतिक कथन आणि व्यावसायिक पद्धतींचा अभ्यास’ या विषयावर या परिषदेचे आयोजन केले होते.
याप्रसंगी डॉ. लक्ष्मण प्रसाद भंडारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जागतिकीकरणाच्या काळात नव्या आर्थिक संधी स्वीकारताना आपल्या स्थानिक भाषांचा सन्मान राखणे गरजेचे आहे. भाषा, साहित्य आणि वाणिज्य यांचा परस्परसंवाद हा केवळ व्यावसायिक नसून तो सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठीही महत्त्वाचा आहे. परिषदेच्या समन्वयक डॉ. रोहिणी कासार यांनी प्रास्ताविकात परिषदेची भूमिका स्पष्ट करताना जागतिकीकरणाच्या युगात सांस्कृतिक कथन आणि व्यावसायिक पद्धतींच्या अभ्यासाचे महत्त्व विशद केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या ‘कार्यवृत्तिकेचे’ प्रकाशन उत्साहात करण्यात आले.
इंग्रजी अध्ययन मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, राहाता महाविद्यालय हे ग्रामीण भागात असूनही सर्व आधुनिक सुविधांनी युक्त आहे. अशा परिषदांमुळे संशोधन, नव्या संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संवादाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ. सत्यजीत पोतदार यांनी प्रास्ताविक करून सर्वाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा पाटील व प्रा. प्रणाली बोठे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. शेखर ब्राह्मणे यांनी मानले. या आंतरराष्ट्रीय परिषदेला विविध स्तरांतून संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी डॉ. बिनोद कुमार विश्वकर्मा, डॉ. आनंद बी. कुलकर्णी, डॉ. मनीषा नेसरकर, प्रा. डॉ. सदानंद भोसले, ॲड. रघुनाथराव बोठे, भगवानराव डांगे, प्रमोद गोंदकर, ज्ञानदेव चोळके, डॉ.भास्कर शेळके, डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य हरिभाऊ आहेर, प्राचार्य संतोष औताडे, प्राचार्य किशोर निर्मळ, प्राचार्य कमलाकर कसबे, उपप्राचार्य संजय लहारे, डॉ. संजय कदम, डॉ. राजाराम वाकचौरे, डॉ. ऐनूर शेख आदि उपस्थित होते.