गावातील वाद एकत्रित बसून मिटवा, विकासाची प्रक्रिया थांबू देऊ नका!
◻️ मंत्री विखे पाटील यांचे पाथरे, कोल्हार आणि भगवतीपूरमध्ये ‘संपर्क अभियान’
संगमनेर LIVE (लोणी) | विकासाच्या बरोबरीने रोजगार निर्माण करण्यास आपले प्राधान्य आहे. पायाभूत सुविधांची काम सुरू आहेत, यासाठी निधीची उपलब्धता होत असून, गावातील प्रश्न एकत्रितपणे बसूनच सोडविण्याचा सल्ला जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना दिला.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदार संघातील गावांमध्ये संपर्क अभियान सुरू केले. थेट गावात जावून नागरीकांचे प्रश्न समजून घेतानाच विकास प्रक्रीये बाबत स्थानिकांची मत जाणून घेत आहेत. मंत्री विखे पाटील यांनी पाथरे बु, कोल्हार, भगवतीपूर या गावात जावून ग्रामस्थ आणि कार्यकर्त्याच्या भेटी घेतल्या.
महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांची अंमलबजावणी गावातील रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व्यवस्था, अतिक्रमणाची परीस्थीती या विषयावर त्यांनी मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. विकास प्रक्रीयेला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमण तातडीने काढून टाकण्यासाठी गांभीर्याने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विकासाची प्रक्रीया निरंतर सुरू असली तरी, विकासाच्या संकल्पना पुर्णपणे बदलल्या आहेत. गावाचा चेहरा बदलण्यासाठी उद्योग आणि रोजगाराच्या निर्मिती शिवाय पर्याय नाही. त्यामुळेच उद्योग निर्मितीला विकासाचा भाग बनविला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये निबे उद्योग समूहाचा उभा राहीलेला प्रकल्प संपूर्ण जिल्ह्याची मोठी ओळख ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करून, आणखी अनेक चांगले उद्योग समूह आपल्या भागात येण्यास तयार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जलसंपदा विभागाच्या कामाना निधीची कमरता भासणार नाही. प्रवरा कालव्याच्या कामाकरीता १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, या कामातून कालव्याची काम होतील. नदीजोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले आहे. भंडारदारा, निळवंडे धरणातील पाण्याचा साठा तसेच आवर्तनाचे नियोजन करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची आपण बैठक घेतली असून उन्हाळी हंगामातील पाण्याच्या आवर्तनाबाबत आढावा घेतला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
गावपातळीवर गटातटाच्या वादात विकासाची प्रक्रीया अडकू देवू नका असा सल्ला देवून, वर्षानुवर्ष सुरू असलेले वाद सामजस्याने मिटविण्यासाठी गावातील लोकांनीच एकत्रितपणे पुढाकार घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.