महामानवाच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे रुग्णवाहिकेचे (ॲम्बुलन्स) लोकार्पण!
◻️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार जगाला मार्गदर्शक - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | “महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत परंपरेचा समृध्द वारसा सांगणारी राज्यघटना देशाला दिली आहे. आपली राज्यघटना आणि लोकशाही हाच या देशाचा आत्मा असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार आज संपूर्ण जगाला दिशा देणारा ठरत आहे.” असे गौरवपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर हायटेक बस स्थानक परिसरात ‘राष्ट्रीय दलित पॅथर’ आणि ‘राजू खरात मित्र मंडळा’च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या मंगलप्रसंगी गरजू रुग्णांच्या सेवेसाठी नूतन रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्री थोरात, राष्ट्रीय दलित पॅथरचे राजू खरात, विश्वासराव मुर्तडक, सीताराम राऊत, प्रवीण गायकवाड, रवी गिरी, ऋतिक राऊत, जीवन पांचारिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन गरीब आणि शोषितांच्या न्यायासाठी लढा दिला, त्यामुळे त्यांनी दिलेली राज्यघटना जपण्याची जबाबदारी आता युवा पिढीची आहे.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ त्यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारण्याचा संकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
डॉ. जयश्री थोरात यांनी राजू खरात मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, ही रुग्णवाहिका सेवा गोरगरिबांसाठी आधारवड ठरेल आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठी मदत होईल.
राजू खरात यांनी आपल्या मनोगतातून, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख करत, सर्वानी अशा सर्वसमावेशक नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गायकवाड यांनी केले, तर रवी गिरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. दलित पॅथरच्या कार्यकर्त्यानी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने महामानवाच्या जयंतीचा उत्सव साजरा केला. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल परिसरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.