“फुले दाम्पत्याच्या कार्यामुळेच आजच्या स्त्रिया प्रगतीच्या शिखरावर” - सौ. नीलम खताळ
◻️ स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचणाऱ्या क्रांतीसूर्याला संगमनेरमध्ये वंदन!
संगमनेर LIVE | महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचला. त्यांच्या याच महान कार्यामुळे आज महिलांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध झाल्या असून, त्या आज जगाच्या पाठीवर विविध क्षेत्रांत आपला यशाचा ठसा उमटवत आहेत, असे गौरवउद्गार सौ. नीलम खताळ यांनी काढले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरातील पुतळ्यास सौ. नीलम खताळ यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात माळीवाडा येथील मारुती मंदिरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, अर्चना चिपाडे, सुवर्णा ताजणे, नम्रता अभंग, मीनल अभंग, रेखा गलांडे, संगीता पुंड, मनीषा अभंग, अश्विनी ढोले, जोती बालसराफ, सांगिता मंडलिक, जयश्री पुंड, सविता पावबाके, सुनीता माताडे, बंटी मंडलिक, किशोर ढोले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना सौ. खताळ म्हणाल्या की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणच दिले नाही, तर अंधश्रध्दा, जातिभेद आणि स्त्री-पुरुष असमानतेविरुध्द लढा देत समाजात मोठी क्रांती घडवून आणली. त्यांच्या विचारांमुळेच आजची स्त्री खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाली आहे. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजाने प्रगतीकडे वाटचाल करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, या कार्यक्रमाला संगमनेर शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, फुले दांपत्याच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.