एसव्हीआयटी चिंचोली येथे विद्यार्थ्यासाठी १५ दिवसांची कार्यशाळा संपन्न!
◻️ माहिती तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने विद्यार्थ्याच्या कौशल्य विकासाला गती
संगमनेर LIVE (सिन्नर) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SVIT), चिंचोली येथे माहिती तंत्रज्ञान विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना, डेटा पूर्वप्रक्रिया’ या विषयावरील १५ दिवसांचा मूल्यवर्धित अभ्यासक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
या सखोल प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातील यंत्र शिक्षणाच्या मूलभूत संकल्पनांपासून ते विदा पूर्वप्रक्रिया (Data Pre-processing) आणि विविध तांत्रिक कलनविधी (Algorithms) वापरून नमुने (Models) तयार करण्यापर्यंतचे सखोल ज्ञान आत्मसात केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यानी केवळ तात्विक ज्ञान न घेता पायथन आज्ञावलीच्या सहाय्याने प्रत्यक्ष ‘वास्तव-वेळ’ (Real-time) प्रकल्प विकसित करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही पूर्ण केले.
या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक विश्लेषण क्षमता आणि समस्या निवारण कौशल्ये (Problem Solving Skills) मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची ही ओळख आणि उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात केल्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक नियुक्तीच्या (Placement) संधींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
नाशिक येथील तज्ज्ञ मार्गदर्शक स्वप्निल पगार यांनी या अभ्यासक्रमाचे प्रभावी संचालन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अनेक क्लिष्ट प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. सारंग पांडे, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रतिभा काशीद, प्रशिक्षण आणि व्यवसाय नियुक्ती समन्वयक प्रा. ऋषिकेश भालेराव तसेच विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी या यशस्वी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले आहे.