निळवंडे लाभक्षेत्रातील कालव्याना उद्या १५ एप्रिलपासून पाणी सुटणार
◻️मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जलसंपदा विभागाला तातडीचे निर्देश
संगमनेर LIVE (लोणी) | अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात वाढत्या उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाई लक्षात घेता, निळवंडेच्या उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून येत्या १५ एप्रिलपासून पाणी सोडण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच, डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
राज्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. शेतकऱ्यांची ही अडचण आणि अकोले तालुक्यातील ग्रामस्थांनी केलेली मागणी लक्षात घेऊन मंत्री विखे पाटील यांनी संवेदनशीलतेने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे केवळ अकोलेच नव्हे, तर संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव या पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, उच्चस्तरीय कालव्यांवरील शेतकऱ्यांनीही पाण्यासाठी मागणी केली होती, ती मागणी मान्य झाल्यामुळे आता उंचावरील शेतीलाही नवसंजीवनी मिळणार आहे.
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच नामदार विखे पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना दिली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नियोजित वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नियोजनानुसार, उजवा व उच्चस्तरीय कालवा १५ एप्रिलपासून प्रवाहित होणार असून, त्यापाठोपाठ २५ एप्रिलपासून डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू होईल. यामुळे या पाचही तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न प्राधान्याने सुटण्यास मदत होणार असून ऐन उन्हाळ्यात शेतीलाही मोठा आधार मिळणार आहे.