अध्यात्मिक अधिष्ठानातूनचं सुसंस्कृत समाज निर्मिती - महंत दत्तगिरी महाराज
◻️ दाढ खुर्द येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा संपन्न
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील ‘श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रा’त श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता बुधवार, १५ एप्रिल रोजी महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते महानैवेद्य आरतीने झाली.
या मंगलप्रसंगी आयोजित संतदर्शन व प्रवचन सोहळ्यात महंत दत्तगिरी महाराज आपल्या ओघवत्या वाणीने भाविकांना मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की, “आजच्या धावपळीच्या युगात मानवी जीवनात ईश्वराचे अधिष्ठान असणे नितांत गरजेचे आहे. तरुण पिढी ही देशाचा आधारस्तंभ असून, ही पिढी वाम मार्गाला लागू नये आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत, यासाठी मोरे दादांनी स्थापन केलेली सेवा केंद्रे दीपस्तंभासारखे कार्य करत आहेत,” असे सांगितले.
महाराजांनी पुढे बोलताना केंद्राच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. केंद्रात होणारी देवतांची सेवा, पूजापाठ, ग्रंथवाचन आणि विशेषतः ‘बालसंस्कार’ यांमुळे भावी पिढी सुसंस्कृत होत आहे. असा सुसंस्कृत समाज निर्माण झाल्यामुळे समाजातील अपप्रवृत्तींना आळा बसेल आणि एक निकोप समाज घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महानैवेद्य आरतीने झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी दाढ खुर्दसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सेवेकरी आणि स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.