अक्षय कर्डिलेंना निवडून देणे म्हणजे सुजय विखेंनाच आमदार करणे!
◻️डॉ. सुजय विखे पाटील यांचा राहुरीकराना विकास कामांना गती देण्याचां शब्द
संगमनेर LIVE (गुहा, राहुरी) | "स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या पश्चात ही निवडणूक केवळ एका पदासाठी नसून या भागाच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी आहे. अक्षय कर्डिले यांना निवडून देणे म्हणजे पर्यायाने मलाच (डॉ. सुजय विखे पाटील यांना) आमदार म्हणून निवडून देण्यासारखे आहे. अक्षय आमदार झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येक अर्जावर आणि कामावर मी स्वतः लक्ष देऊन ते पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो,” अशी ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील तांबेरे, गुहा आणि गणेगावसह विविध गावांमध्ये आयोजित प्रचारसभांमध्ये डॉ. विखे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, अक्षय आमदार होणे म्हणजेच माझ्या माध्यमातून विकासकामांना खऱ्या अर्थाने गती मिळणे होय. विरोधकांनी केवळ पाहणी आणि आश्वासनांचे राजकारण केले, मात्र प्रत्यक्षात निळवंडे पाणी प्रकल्पाचे पाणी शिवारात आणण्याचे ऐतिहासिक काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीच जलसंपदा मंत्री असताना पूर्ण केले.
गुहा गणाकरीता १८६ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून, त्यातून रस्ते, ग्रामीण रुग्णालय आणि सामाजिक सभागृहांची कामे वेगाने सुरू आहेत. पुढील तीन वर्षांत ‘पीडीएन’ (PDN) प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील यांनी भावनिक आवाहन करताना सांगितले की, मी नेहमीच सर्वसामान्य आणि गरिबांसाठी काम करत आलो असून पराभवानंतरही मी जनतेची सेवा करणे सोडलेले नाही. या प्रचाराची सांगता करण्यासाठी २० एप्रिल रोजी राहुरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेला विक्रमी संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ही निवडणूक म्हणजे गावाच्या भविष्याची आणि विकासाची निर्णायक लढाई असून, प्रत्येक कार्यकर्त्याने आता घराघरात पोहोचून अक्षय कर्डिले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान, या सभेला भाजप, महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.