मांचीहिल येथील अश्विन आयुर्वेद महाविद्यालयात संयुक्त जयंती साजरी
◻️ महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवपाल खंडीझोड होते. संस्थेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. गौरव डोंगरे, डॉ. शुभांगी नलावडे, डॉ. विक्रम शेलवले, डॉ. ज्योती खंदारे, डॉ. अतिक मोमीन, डॉ. अविनाश जाधव, डॉ. अंबादास काळूखे, डॉ. जयश्री कोल्हे, डॉ. गीता दातीर, डॉ. सुषमा खंडीझोड, डॉ. कुलदीप पवार, डॉ. सिध्देश कानडे, डॉ. प्रियंका आढाव, अशोक पर्वत, संदीप गाडेकर आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी आदित्य आवचार या विद्यार्थ्याने महात्मा फुले यांची वेशभूषा परिधान करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण केले, तर हरी चव्हाण या विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
संगणक विभाग प्रमुख अशोक पर्वत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात दोन्ही महापुरुषांच्या कार्याची ओळख करून देताना सांगितले की, आजच्या धकाधकीच्या युगात केवळ उत्सव साजरा न करता त्यांचे विचार आचरणात आणण्याची आणि विचारांची जयंती साजरी करण्याची खरी गरज आहे. विद्यार्थ्यानी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयुर्वेद क्षेत्रात क्रांती घडवून आणावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवपाल खंडीझोड यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, महापुरुषांचे विचार भावी पिढीने जीवनाच्या प्रत्येक वळणावर कृतीत उतरवणे आवश्यक आहे. या सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. ज्योती खंदारे यांनी केले, तर सूत्रसंचालन जागृती दाभाडे व आयुषी निकम यांनी केले. शेवटी हरी चव्हाण याने सर्वाचे आभार मानले. हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी मृत्युंजय बचने यांच्यासह महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.