सावरचोळ मेंगाळवाडी येथील बिरोबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा!
◻️ पालकमंत्र्यांची मंजुरी; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील सावरचोळ मेंगाळवाडी येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बिरोबा देवस्थानला राज्य शासनाकडून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसराच्या विकासाला आता मोठी गती मिळणार असून, संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बिरोबा देवस्थान हे केवळ सावरचोळ मेंगाळवाडीपुरते मर्यादित नसून संगमनेर आणि अकोले तालुक्यातील हजारो भाविकांचे प्रमुख श्रध्दास्थान आहे. याठिकाणी वर्षभर भाविकांची मोठी मांदियाळी असते, मात्र सुविधांच्या अभावामुळे विकासकामांत अनेक मर्यादा येत होत्या.
आता शासनाकडून 'क' वर्ग दर्जा मिळाल्यामुळे मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते विकास, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छता आणि भक्तनिवासासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी सरकारी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाणार असल्याने भाविकांची मोठी सोय होणार आहे.
या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांनी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या संदर्भात वेळोवेळी मागणी लावून धरली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच पालकमंत्र्यांनी या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
“बिरोबा देवस्थान हे परिसरातील जनतेच्या श्रध्देचे केंद्र आहे. या ठिकाणाचा सर्वागीण विकास व्हावा आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी हा दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.
दरम्यान, या निर्णयाचे सरपंच सुनीता कानवडे, संजय कानवडे, संपत कानवडे आणि सागर कानवडे, सावरचोळ मेंगाळवाडी ग्रामस्थांसह दोन्ही तालुक्यातील भाविकांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आमदार आणि पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तर, यामुळे बिरोबा देवस्थानच्या वैभवात भर पडणार असून, येणाऱ्या काळात हे ठिकाण उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.