खत टंचाई संकटावर मात करण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज - डॉ. अजित नवले
◻️ खरीप हंगामावर ‘खत टंचाई’चे सावट; देशाची अन्नसुरक्षा धोक्यात?
संगमनेर LIVE (शिर्डी) | जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने पाहता, आगामी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खत टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलून खत निर्मितीसाठी कच्चामाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी किसान सभेचे नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
खतांची भीषण टंचाई निर्माण झाल्यास त्याचे अत्यंत वाईट परिणाम शेती क्षेत्रावर होतील, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला आहे. खतांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होऊन देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या घटीचा थेट परिणाम बाजारपेठेवर होऊन भविष्यात महागाई प्रचंड वाढू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
भारताला आजही खतांसाठी लागणारा मोठा कच्चामाल परदेशातून आयात करावा लागतो. सध्याची आंतरराष्ट्रीय स्थिती आणि परकीय चलनाची उपलब्धता पाहता, सरकार खतांच्या आयातीवर पुरेसा खर्च करू शकेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना संभाव्य टंचाईची जाणीव करून देत शेतकऱ्यांना खते जपून वापरण्याचे निर्देश दिले आहेत, यावरून परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते.
केवळ काटकसरीचा सल्ला देऊन हे संकट टळणार नाही. असणारा कच्चामाल योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कठोर प्रयत्न करावेत, जेणेकरून खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही टंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे आवाहन किसान सभेतर्फे करण्यात आले आहे.
“शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि अन्नधान्याचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी खतांचा अखंडित पुरवठा होणे अनिवार्य आहे. सरकारने आत्ताच नियोजन केले नाही, तर महागाईचा भडका उडेल.” असे डॉ. अजित नवले म्हणाले आहेत.