८१ लाख लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणूक - बाळासाहेब थोरात
◻️ महायुती सरकारवर थोराताची घणाघाती टिका
संगमनेर LIVE | “लाडक्या बहिणींच्या मतांमुळेच सध्याचे महायुती सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, आता राज्यातील ८१ लाख महिलांना अपात्र ठरवून सरकारने या लाडक्या बहिणींचा मोठा विश्वासघात केला असून त्यांची फसवणूक केली आहे,” अशी घणाघाती टीका काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. महिलांना योजनेतून बाहेर काढणे हा त्यांच्यासोबत केलेला मोठा धोका असल्याचे थोरात म्हणाले.
यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा सध्याच्या सरकारने बळी दिला आहे. भ्रष्टाचाराला सर्वत्र ऊत आला असून, निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी केला जात आहे, असेही ते म्हणाले.
भाजपकडून इतर पक्षांतील नेत्यांना आणि कार्यकर्त्याना पक्षात घेण्याचे काम सुरू आहे. यामुळे मूळ भाजपचे कार्यकर्ते बाजूला पडत असून, भविष्यात मूळ भाजप दिसेनाशी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या राजकारणामुळे प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरू असून, देशात भविष्यात केवळ भाजप आणि काॅग्रेस हे दोनच मुख्य पक्ष उरतील असे चित्र असल्याचे थोरात यांनी नमूद केले.
काॅग्रेस पक्षात तरुणांना मोठी संधी उपलब्ध असून, नवीन नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. राज्यातील दुर्दैवी राजकारणाकडे जनतेने आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली असून, ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी सुद्धा जनतेचीच आहे. येणाऱ्या काळात जनता काॅग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.