लोकांच्या गरजा सोडवण्याला आणि विकास कामांना माझे प्राधान्य - आमदार अमोल खताळ
◻️ श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे विविध विकासकामाचे भूमिपूजन संपन्न
संगमनेर LIVE | “श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विकासाची कामे करताना मी कधीही राजकारण करत नाही, केवळ लोकांच्या गरजा आणि विकासाला माझे प्रथम प्राधान्य असते," असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील श्री क्षेत्र निझर्णेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते रामभाऊ जोंधळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव पवार, खजिनदार बाळासाहेब जोंधळे, सचिव गंगाधर वायकर, भाजपचे दादाभाऊ गुंजाळ यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ यांनी गेल्या दीड वर्षांत कोकणगावच्या विकासासाठी २ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी आणल्याची माहिती दिली. तसेच, ठेकेदाराला कामाचा दर्जा उत्तम राखण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
या कार्यक्रमादरम्यान आमदार खताळ यांनी पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच व्हावा, यासाठी आपण खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि इतर मंत्र्यांसमवेत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असून, या मार्गासाठी पूर्ण ताकदीने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान, विविध विकासकामांच्या उध्दघाटनापूर्वी आमदार खताळ यांनी श्री निझर्णेश्वर मंदिरात जाऊन भगवान महादेवाचे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. परिसरातील ग्रामस्थांनी विकासाच्या कामांना दिलेल्या गतीबद्दल आमदार खताळ यांचे कौतुक केले.
पर्यटनासाठी ‘टायगर सफारी’चा प्रस्ताव..
निझर्णेश्वर मंदिर परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी वनविभागामार्फत राज्य सरकारकडे ‘टायगर सफारी’ उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. ही सफारी साकारल्यास या भागातील युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.