सौर ऊर्जा ही काळाची गरज - बाळासाहेब थोरात
◻️ सहकार महर्षी कारखान्याच्या इमारतीवर ५० किलोवॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित
संगमनेर LIVE | संपूर्ण देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आता ऊर्जेच्या क्षेत्रातही आधुनिक पाऊल उचलले आहे. कारखान्याच्या नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारतीवर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, नुकतेच या प्रकल्पाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, विजेच्या वाढत्या मागणीमुळे सर्वत्र टंचाई निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत वीज बचतीसह सौर ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. थोरात कारखान्याने नेहमीच शेतकरी, सभासद आणि कामगारांचे हित जोपासले असून, कारखान्याने उभारलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प इतर कारखान्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. असे नमूद केले.
या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता ५० किलोवॅट इतकी आहे. या प्रकल्पामुळे नवीन प्रशासकीय इमारतीच्या दैनंदिन कामकाजासाठी लागणारी वीज आता सौर ऊर्जेद्वारे उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे विजेची मोठी बचत होणार आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे कारखान्याने पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करून ५५०० मे. टन गाळप क्षमता आणि ३० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प यापूर्वीच यशस्वीपणे कार्यान्वित केले आहेत.
यावेळी त्यांनी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघानेदेखील १३३५ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्याचा उल्लेख केला. यामुळे विजेचा खर्च वाचणार असून त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. एकंदरीतच, या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कारखान्याचा आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराचा नवा आदर्श कारखान्याने निर्माण केला आहे.