संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान
◻️ नेवासेकरांच्या वतीने माऊलींना मंगलमय वातावरणात निरोप
संगमनेर LIVE (नेवासे) | संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी पालखी दिंडीने बुधवारी (दि. ८ जुलै) नेवासे शहरातून पंढरपूरकडे अत्यंत उत्साहात प्रस्थान केले. “ज्ञानोबा माऊली तुकाराम"च्या जयघोषाने आणि विठुरायाच्या गजराने संपूर्ण नेवासे नगरी दुमदुमून गेली होती.
माऊलींच्या पालखीचे नेवासे शहरात आगमन होताच भक्तांनी उत्साहाने स्वागत केले. रस्ते सडा-रांगोळीने सजले होते, तर तोफांची सलामी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळून निघाला होता. जेसीबीच्या साहाय्याने माऊलींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्याचे पहिले रिंगण नेवासा एसटी डेपोच्या परिसरात पार पडले. विशेष म्हणजे, माऊलींच्या पादुका घेऊन जाणारी कैलास आप्पासाहेब जाधव यांची बैलजोडी या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरली असून, तिची सजावट पाहून उपस्थितांचे डोळे दिपले.
यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. देहू-आळंदी पालखी सोहळ्याप्रमाणेच, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयी-सुविधांसाठी यंदा विशेष नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मै, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सोहळ्यासाठी उत्तम व्यवस्था केली होती.
संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख महंत देवीदास महाराज म्हस्के आणि राऊत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली.
याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे, युवा नेते उदयन गडाख, शिवसेना नेते प्रभाकर शिंदे, सौ. रत्नमाला लंघे, नेवासा नगरपंचायत अध्यक्ष डॉ. करण घुले, उपाध्यक्ष शालिनी सुखधान, माऊली पेचे, बाळासाहेब शिंदे, दिलीपराव पवार, बाळासाहेब पवार प्रतापराव चिंधे, संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त कैलास जाधव, देवस्थान जनसंपर्क अधिकारी आशिश चावरे, सुनिल मोरे, धनंजय पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, गटविकास अधिकारी संजय लखवाल आदीं सह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, हा पालखी सोहळा अत्यंत शिस्तबध्द आणि सुरक्षित पद्धतीने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला असून, भाविकांसाठी ठिकठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.