प्रति आवर्तन २४ हेक्टरला मिळणार एक कोटी लिटर पाणी - डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर Live
0
प्रति आवर्तन २४ हेक्टरला मिळणार एक कोटी लिटर पाणी - डॉ. सुजय विखे पाटील 

◻️ शेततळ्यांच्या कागदासाठी ६० कोटींचे अनुदान तर, प्रवरा कालव्यांसाठी १५० कोटी मंजूर

संगमनेर LIVE | “निळवंडे लाभक्षेत्रातील अनेक भागाला अद्याप पाण्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पाणी वाटपासाठी लवकरच स्वतंत्र ‘पाणी वाटप संस्था' स्थापन केली जाणार आहे. या संस्थेच्या चेअरमनपदी त्या क्षेत्रातील सर्वात मोठे क्षेत्र असणारा शेतकरी असेल. तसेच आठ-आठ हेक्टरचे तीन गट करून एका आवर्तनात प्रत्येक गटाला ३० लाख लिटर पाणी दिले जाईल. अशा प्रकारे २४ हेक्टरला एका आवर्तनात पाईपद्वारे तब्बल एक कोटी लिटर पाणी पुरवण्यात येईल.” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

​संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. १०) शिर्डी विधानसभा मतदारसंघ स्तरीय आढावा व समन्वय बैठक तसेच मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) बैठक पार पडली. यामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. विखे पाटील बोलत होते. ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर, कैलास तांबे, मच्छिंद्र थेटे, आर. डी. कदम, विजय म्हसे, भगवान इलग, कांचनताई मांढरे, रोहिनीताई निघुते, तबाजी मुन्तोडे, अजय ब्राम्हणे, गोकुळ दिघे, दिलिप मुन्तोडे, सतिश जोशी, शिवाजी इलग, भारत गिते, अशोक जऱ्हाड यांच्यासह २८ गावातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, बीएलओ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, निळवंडे धरणाचे पाणी प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईनचे जाळे विणावे लागेल. ऑटोमेशनची योजना रद्द करून त्यातून वाचणारे ६० कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या थेट उपयोगासाठी वळवले असून यातून शेततळ्यांचे आच्छादनासाठी लागणाऱ्या प्लास्टिक कागदासाठी शेतकऱ्यांना ६० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे आवर्तन संपल्यानंतरही शेततळ्याच्या माध्यमातून दोन महिने शेतीला पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. तसेच, मॅन्युअल व्हॉल्व्हच्या तीन पाईपामध्ये आणखीन एक पाईप जोडून ओव्हरफ्लोचे पाणी प्रत्येक गावातील शेततळ्यात सोडण्याचे नियोजन मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.

निमगावजाळी येथे उभारण्यात येणाऱ्या 'बिबट सफारी' प्रकल्पासाठी सुरवातीला १५ कोटी मंजूर झाले आहेत. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर त्याचे काम लवकरच सुरू होईल. तसेच, निझर्णेश्‍वर मंदिर परिसरात प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रस्तावही सरकारला पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले. यामुळे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि यातून अर्थकारणाला मोठी चालणा मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी​ प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी दीडशे कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच कालवा आणि पोटचाऱ्याच्या कामांना गती मिळणार असल्याचे देखील सांगितले.

भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “विखे पाटील परिवाराचे अस्तित्व भाजपमुळे आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व कार्यक्रम पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नियमितपणे पार पाडावेत अशा सूचना दिल्या. तसेच भाजप सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. असे आवाहन केले.

दरम्यान, डॉ. विखे पाटील यांनी ​यावेळी मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाबाबतही मार्गदर्शन केले. ते म्हणाले “२००२ आणि २०२४ च्या यादीतील नावे आणि मतदारांची समांतर पडताळणी पूर्ण झाली असून, सध्या सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मध्ये सर्वांनी नोंदणी करावी. यामधून कोणीताही पात्र व्यक्ती सुटणार नाही अपात्र व्यक्ती फॉर्म भरणार नाही. याची खबरदारी बीएलओ आणि कार्यकर्त्यानी अचूक पार पडावी, यासाठी योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !