सुजय विखे पाटील यांच्या ‘जनता दरबारात’ नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची ग्वाही
◻️ राहाता येथे प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ कारवाईचे निर्देश
संगमनेर LIVE (राहाता) | जनतेच्या अडीअडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी राहाता नगरपालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य ‘जनता दरबार' आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक बळकट झाला आहे.
या दरबारात राहाता तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छता, वीज समस्या, नागरी सुविधा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ यांसारख्या प्रश्नांची निवेदने सादर केली. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले. अनेक तातडीच्या प्रश्नांवर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. सामान्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत.” अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी लोंढे, विविध विभागांचे अधिकारी आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकाच मंचावर आल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण होण्यास मदत झाली.
दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न एकाच ठिकाणी मांडता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हा जनता दरबार केवळ एक राजकीय उपक्रम न राहता, जनतेच्या समस्यांना न्याय देणारे एक प्रभावी माध्यम ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.