आषाढी वारी म्हणजे समता आणि मानवतेचा महासोहळा - बाळासाहेब थोरात
◻️ वडगाव लांडगा येथील दिंडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित प्रस्थान
संगमनेर LIVE | महाराष्ट्राच्या संस्कृतीचा केंद्रबिंदू असलेल्या आषाढी वारीमध्ये जात, धर्म आणि पंथाच्या भिंती गळून पडतात. ‘माऊली’ या एकाच नामाच्या गजरात अखंड महाराष्ट्र एकवटतो, असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्यातील वडगाव लांडगा येथे शांताराम लांडगे यांच्यावतीने आयोजित पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची समृध्द परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यापासून ते संत चोखामेळा, जनाबाईंपर्यंत सर्व संतांनी मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला. “जात-धर्मापेक्षा माणूस म्हणून एकमेकांचा सन्मान करणे, हीच वारकरी संप्रदायाची खरी शिकवण आहे. या संतांनी अंधश्रध्दा आणि कर्मकांडांविरुध्द लढा देऊन समतेचा नवा मार्ग दाखवला,” असेही ते म्हणाले.
पंढरपूरच्या वारीचे वर्णन करताना थोरात म्हणाले की, लाखो भाविक विठू नामाचा गजर करत एकत्र येतात. यामध्ये कोणताही भेदभाव नसतो. ईश्वर कृपेने इतक्या मोठ्या जनसमुदायाची व्यवस्था आपोआप होते, हे जगासाठी एक आश्चर्यच आहे. सध्याच्या काळात धर्माच्या नावावर सुरू असलेले राजकारण दुर्दैवी असून, वारकरी संप्रदायाचा हा समतेचा विचार जपण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.