गुरुपौर्णिमा उत्सवासाठी संगमनेर आगाराकडून १५ जादा एसटी बसेस
◻️ आश्वी, जवळे कडलग, राजापूर, प्रतापपूर आदि गावांसाठी विशेष बसची व्यवस्था
संगमनेर LIVE | गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे होणाऱ्या भव्य गुरुपौर्णिमा उत्सवासाठी संगमनेर आगाराने भाविकांसाठी मोठी खूशखबर दिली आहे. तालुक्यातील दत्त सेवेकरी व भाविकांची प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये, यासाठी संगमनेर आगाराच्या वतीने १५ जादा एसटी बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र नारायणपूर येथे सद्गुरू नारायण महाराज यांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरू टेंबे स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून हजारो भाविक नारायणपूर येथे दाखल होतात. संगमनेर तालुक्यातूनही दरवर्षी मोठ्या संख्येने दत्तभक्त दर्शनासाठी जातात.
यंदाही भाविकांची होणारी गर्दी आणि वाढती संख्या विचारात घेऊन संगमनेर आगाराने विशेष नियोजन केले आहे. ज्या गावातून ५० ते ५५ प्रवासी उपलब्ध होतील, त्या गावातून थेट नारायणपूरसाठी स्वतंत्र एसटी बस सोडण्यात येणार आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन या विशेष जादा बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जवळे कडलग, राजापूर, चिखली, गुंजाळवाडी, मंगळापूर, पेमगिरी, निमगाव पागा, प्रतापपूर, आश्वी, खळी, पिंपरी, जाखुरी आणि पिंपरणे यांसारख्या प्रमुख गावांचा समावेश आहे.
दरम्यान, संगमनेर आगाराच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील भाविकांना थेट गावापासूनच नारायणपूर येथे जाणे-येणे अधिक सोयीचे आणि सुलभ होणार आहे.
“संगमनेर आगाराच्या वतीने करण्यात आलेल्या या विशेष बससेवेचा तालुक्यातील जास्तीत जास्त दत्तसेवेकरी व भक्तांनी लाभ घ्यावा.” असे आवाहन बापूसाहेब देशमुख यांनी केले.