दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याविरुध्द उद्या भव्य मशाल मोर्चा
◻️ संगमनेर येथे ‘समविचारी प्रवाह'तर्फे सायंकाळी ६ वाजता एल्गार
संगमनेर LIVE | शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे आणि नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेला अमानुष लाठीहल्ला याविरोधात संगमनेर येथे संतापाची लाट पसरली आहे. या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्या बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता संगमनेर बस स्थानक परिसर येथे एका भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी देशाभरातील हजारो विद्यार्थी मागील २१ दिवसांपासून दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करत होते. दरम्यान, २० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसदेकडे शांततेने मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला असता, केंद्र सरकारने त्यावर अत्यंत निर्दयीपणे लाठीहल्ला केला. या अमानुष कारवाईत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे.
या कृत्यामुळे देशभरात आणि जगभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी या घटनेविरुध्द निदर्शने होत आहेत. कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली असून, देशाच्या लोकशाही इतिहासातील ही अत्यंत काळी व वाईट घटना असल्याचे म्हटले आहे.
या दडपशाहीचा आणि लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी ‘समविचारी प्रवाह, संगमनेर’ यांच्या वतीने या मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर बस स्थानकापासून सुरू होणाऱ्या या मोर्च्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संगमनेर तालुका कॉग्रेस कमिटी व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने सर्व समविचारी पक्ष, तरुण-युवक आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या मशाल मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.