बळीराजाच्या शिवारात सुख-समृध्दी नांदो - आमदार अमोल खताळ
◻️ आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठ्ठलचरणी प्रार्थना
संगमनेर LIVE | आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि संपूर्ण समाजाच्या सुख-समृध्दीसाठी मनोभावे प्रार्थना केली. यंदाच्या हंगामात राज्यात भरपूर पाऊस पडावा, शेतकऱ्यांची पिके जोमाने लागावीत आणि प्रत्येकाच्या घरात आनंद, समाधान व भरभराट नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठुरायाच्या चरणी अर्पण केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि वाघापूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन सपत्नीक विधिवत श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विशेष पूजा-अर्चा करून राज्याच्या प्रगतीसह शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि सर्व समाजबांधवांच्या कल्याणासाठी साकडे घातले. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आमदार खताळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
दरम्यान, यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले, “आषाढी एकादशी हा भक्ती, सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा अत्यंत पवित्र दिवस आहे. संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात बंधुभाव, सद्भावना आणि सेवाभाव वृध्दिंगत करणे हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. यंदाच्या वर्षात समाधानकारक पाऊस पडून बळीराजाच्या आशा-अपेक्षा पूर्ण होवोत, शेतकऱ्यांच्या शिवारात हिरवाई बहरू दे आणि प्रत्येक कुटुंब सुखी होवो,” अशी प्रार्थना केल्याचे यावेळी बोलताना सांगितले.