आमदार अमोल खताळांच्या तत्परतेमुळे लोहारे-कासारे पाझर तलावातून पाणी सुटले
◻️ खरीप पिकांना मिळाले जीवदान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील लोहारे-कासारे येथील पाझर तलावातील पाणी अखेर खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी आणि नागरिकांच्या पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत लघु पाटबंधारे विभागाला दिलेल्या थेट सूचनेमुळे ही कार्यवाही त्वरित झाली असून, परिसरातील बळीराजाला याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्यास पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. यासोबतच परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर लोहारे-कासारे परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन पाझर तलावातील पाणी सोडण्याची विनंती केली होती.
शेतकऱ्यांची ही अडचण आणि पाण्याची निकड ओळखून आमदार खताळ यांनी कोणतीही वेळ न दवडता लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगत तलावातील पाणी तत्काळ सोडण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. आमदारांच्या या सूचनेनुसार प्रशासनाने वेगाने हालचाली करत तलावातून पाणी सोडण्याची कार्यवाही पूर्ण केली.
पाझर तलावाचे पाणी सोडण्यात आल्याने सुकत चाललेल्या खरीप पिकांना सिंचनासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गरजही यामुळे भागणार आहे. ऐन गरजेच्या वेळी पाणी मिळाल्यामुळे लोहारे-कासारे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करून आपला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात केवळ आश्वासनांची खैरात न वाटता प्रशासनाकडे योग्य पाठपुरावा करून प्रत्यक्ष निर्णय अमलात आणणे महत्त्वाचे असते. लोहारे-कासारे येथील शेतकऱ्यांची पाण्याची गरज ओळखून तातडीने पाझर तलावातून पाणी सोडण्यात आल्याने, खरीप पिकांना केवळ आधारच मिळाला नाही, तर लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मोठी मदत झाली आहे.