मंत्री विखे पाटलांची आश्‍वासन पूर्ती; भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश!

संगमनेर Live
0
मंत्री विखे पाटलांची आश्‍वासन पूर्ती; भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश!

◻️ संगमनेर-सिन्नरमधील ३५ पाझर तलाव भरणार; ६०६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा - वैतरणा - गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याच्या प्रस्तावाला महायुती सरकारने मान्यता दिल्याने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोजापूर पूरचारीद्वारे तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील जलसाठे भरून देण्याच्या निर्णयामुळे ३५ पाझर तलाव भरले जाणार असून, लाभक्षेत्रातील ६०६.६३ हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.

तालुक्यातील भोजापूर मध्यम प्रकल्प हा संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २७ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश दमणगंगा - वैतरणा - गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्णय घेतला होता. याबाबत गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे भोजापूर पूरचारीसाठी ४ द.ल.घ.मी. पाणी प्रस्तावित करण्यात आले आहे. या माध्यमातून ६०६.६३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचे प्रयत्न प्रशासकीय स्तरावर वेगाने सुरू झाले आहेत. भोजापूर प्रकल्पाचा समावेश दमणगंगा - वैतरणा - गोदावरी नदीजोड प्रकल्पात करून सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना दिलासा देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिली होती.

प्रस्तावाला मिळालेल्या मान्यतेमुळे भोजापूर लाभक्षेत्रातील गावांमधील अंदाजे ३५ पाझर तलाव आणि जलसाठे भरून दिले जातील. प्रामुख्याने चिंचोली गुरव, पिंपळे, सोनेवाडी, नान्नजदुमाला, सोनोशी, पोखरी हवेली, तळेगाव, करुले, तिगाव आदी गावांमधील पाझर तलावांचा यामध्ये समावेश आहे. पूरचारीद्वारे पाणी देण्याच्या झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दुष्काळी गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, यापूर्वी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भोजापूर चारीच्या कामासाठी मंत्री विखे पाटील यांनी निधीची उपलब्धता करून दिल्यामुळे चारीचे काम पूर्ण करण्यात आले होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !