‘आषाढी-कार्तिकी'प्रमाणे सद्गुरु गंगागिरीजी महाराज सप्ताहास राज्यमान्यता द्यावी!
◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
संगमनेर LIVE (शिर्डी) | लोकांच्या उत्स्फूर्त आणि विक्रमी सहभागामुळे सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह आता खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे. आषाढी-कार्तिकीच्या वारीप्रमाणेच या अखंड हरिनाम सप्ताहाला देखील राज्य सरकारने अधिकृत 'राज्यमान्यता' द्यावी, अशी जाहीर विनंती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
धनगरवाडी (ता. राहाता) येथे संपन्न झालेल्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार रमेश बोरनारे, विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ यांच्यासह अनेक मान्यवर, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित आणि लाखो भाविक उपस्थित होते.
सात दिवसांच्या या सप्ताहात महंत रामगिरी महाराजांच्या अमृतवाणीतून सर्वांना जीवनाचे सार कळाले असून, परस्परांमध्ये बंधुभाव वाढवून व्यसनमुक्त समाज आणि राष्ट्र अधिक बलशाली करण्याचा संकल्प या सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ते पुढे म्हणाले की, महंत रामगिरीजी महाराज अव्याहतपणे अध्यात्माचा हा पवित्र वारसा पुढे घेऊन जात आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा देशातील संपूर्ण आध्यात्मिक चळवळीला मोठे पाठबळ आणि प्रोत्साहन देणारा ठरला आहे. हा सप्ताह आता द्विशताब्दीकडे वाटचाल करत असून, तो भारतातील आध्यात्मिक क्षेत्रातील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक सोहळा ठरला आहे.
लाखो भाविक-भक्तांच्या योगदानाने व जनशक्तीने या सप्ताहाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणूनच, आषाढी-कार्तिकीच्या वारीप्रमाणेच या सप्ताहाला देखील शासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेऊन, राज्य सरकारने या सोहळ्याला अधिकृत राज्यमान्यता प्रदान करावी, अशी आग्रही विनंती मंत्री विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे व्यासपीठावरून केली.