तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर - आमदार अमोल खताळ
◻️ कसारा दुमाला, तळेगाव दिघे व मिर्झापूर शाळेत उभारणार नवीन वर्गखोल्या
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि त्यांना सुरक्षित व प्रशस्त वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी ‘समग्र शिक्षा अभियान’ (सन २०२६-२७) अंतर्गत ६२ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या निधीतून मतदारसंघातील कसारा दुमाला येथील सावंतवस्ती, तळेगाव दिघे येथील धनगरवाडी तसेच मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम आणि मूलभूत पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.
अनेक ग्रामीण शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत वर्गखोल्यांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब गांभीर्याने घेत आमदार खताळ यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा निधी खेचून आणला. नवीन वर्गखोल्यांच्या निर्मितीमुळे शाळांमधील अपुऱ्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून, शिक्षकांना अध्यापनाचे प्रभावी नियोजन करणे शक्य होईल.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहराप्रमाणेच सर्व सोयी-सुविधांनी युक्त दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, ही आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक शालेय वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नक्कीच नवी दिशा मिळेल.” असे यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले आहेत.
दरम्यान, या शाळांना निधी मंजूर झाल्यामुळे सावंतवस्ती, धनगरवाडी आणि मिर्झापूर परिसरातील ग्रामस्थ, पालक तसेच शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.