कर्जमाफीबाबत किसान सभेच्या मागण्यांची अंमलबजावणी सुरू
◻️ कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्याकडून शासन निर्णयाचे स्वागत
संगमनेर LIVE (मुंबई) | शेतकरी कर्जमाफी योजनेतील प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलत ११ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल किसान सभेच्या वतीने कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
यापूर्वी किसान सभेने केलेल्या आंदोलनानंतर पुणे येथे तीन मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या निर्णयानुसार मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ देणे, वनजमीनधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे तसेच तांत्रिक अडचणी अथवा अंगठ्याचे ठसे न उमटल्यामुळे अॅग्रीस्टॅकपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या निर्णयाचे स्वागत करतानाच डॉ. अजित नवले यांनी उर्वरित मागण्यांकडेही सरकारचे लक्ष वेधले आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, तसेच जाचक अटी-शर्तींमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अटी शिथिल करून त्यांना पात्र ठरवण्यात यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, याव्यतिरिक्त, उपसा सिंचन व इतर सिंचन योजनांच्या लाभार्थी सहकारी संस्थांच्या कर्जमाफीचा यापूर्वी झालेला निर्णय अद्याप कागदावरच असून त्याची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी किसान सभेच्या वतीने डॉ. अजित नवले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.