“दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ दे” - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर Live
0
“दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ दे” - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

◻️ पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना


संगमनेर LIVE (लोणी) | “भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजाला सुखी कर, आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ दे,” अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्यात दुष्काळाचे असलेले सावट लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केले असून, राज्यातील सर्वच विभागांची माहिती संकलित झाल्यानंतर टंचाई परिस्थितीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशोत्सवाचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून करण्यात आला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्रीगणेशाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापूरे यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कामगार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही; तरीही राज्यातील सर्व धरणे भरली आहेत. अल निनोच्या संकटाचे परिणाम आता प्रत्यक्षपणे जाणवू लागले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे संकट अधिक तीव्र होत असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे विघ्न दूर करण्यासाठी तसेच दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विघ्नहर्त्याने आम्हांला शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील धरणांमध्ये पाणी उपलब्ध झाले असले तरी २०२७ पर्यंत या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शेतीला पाणी द्यावे लागणारच आहे; परंतु पिण्याच्या पाण्यास जलसंपदा विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. चारा पिकांसाठीही पाण्याची गरज भासणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातसुध्दा चिंताजनक परिस्थिती आहे. परतीचा पाऊस किती प्रमाणात होतो याचा अंदाज अद्याप नाही. राज्यातील सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मदत व पुनर्वसन विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापनाकडून येणाऱ्या आकडेवारीनंतर सर्वसमावेशक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वखाली होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नैसर्गिक संकट लक्षात घेऊन महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकटाच्या समयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ही महायुती सरकारची आहे. सद्य परिस्थितीत निर्माण झालेल्या टंचाईबाबतही सरकार गंभीर असून, मुख्यमंत्री या संदर्भात योग्य निर्णय करतील, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !