जलसंपदा विभागातील अनुभवाचा जलव्यवस्थापनासाठी उपयोग करा - मंत्री विखे पाटील
◻️ पुण्यातील यशदा येथे अभियंता गौरव पुरस्कार वितरण
संगमनेर LIVE (पुणे) | जलसंपदा विभागातून निवृत्त झालेल्या अनुभवी अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग राज्याच्या भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग तसेच प्रत्येक महामंडळाच्या स्तरावर सल्लागार मंडळ स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जलसंपदा विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित आयोजित अभियंता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री गिरिश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रकल्प समन्वय सचिव जयंत बोरकर, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुदर्शन पगार, तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यातील शेती आणि जलव्यवस्थेसाठी अभियंत्यांनी केलेले काम मोठे योगदान देणारे आहे. पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव होत असून, जलसंपदा विभागातील अनुभवी अधिकारी व अभियंत्यांनी प्रदीर्घ काळात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ विभागाला सातत्याने मिळत राहणे आवश्यक आहे. जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या क्षेत्रातही उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर कसा करता येईल, याचा सर्वांनी विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागातील पुरस्कारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली असून, त्यास सकारात्मक प्रतिसाद देताना विखे पाटील यांनी प्रत्येक महामंडळासाठी किमान तीन पुरस्कार देण्याची सूचना केली. पुढील वर्षापासून प्रत्येक महामंडळासाठी तीन ते पाच पुरस्कार ठेवण्यास आपली मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी जलसंपदा विभागातील सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.