बाळासाहेब थोरात यांच्याकडून अण्णा हजारेंच्या प्रकृतीची विचारपूस
◻️ दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE (राळेगणसिध्दी) | ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी राळेगणसिध्दी येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अण्णा नुकतेच राळेगणसिद्धी येथे परतले असून, यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.
या भेटीप्र गासंगी भावना व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “पद्मभूषण अण्णा हजारे हे केवळ अहिल्यानगर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण आहेत. सामाजिक सुधारणा, पर्यावरण संवर्धन, पारदर्शक कारभार आणि ग्रामीण विकास या सर्वच क्षेत्रांत त्यांनी उभारलेले कार्य दीपस्तंभासारखे असून ते भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.” अण्णांची तब्येत आता सुधारत असून त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान अण्णा हजारे यांनीही बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव केला. “महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. एक स्वच्छ, प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती आहे,” अशा शब्दांत अण्णांनी थोरातांचे कौतुक केले तसेच या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.
राज्यातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर संकटसमयी सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.” गणेशोत्सवाच्या आगमनासोबतच राज्यात सर्वदूर दमदार पाऊस व्हावा, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, याप्रसंगी डॉ. सुधीर तांबे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या सदिच्छा भेटीच्या वेळी उपस्थित कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अण्णा हजारे व बाळासाहेब थोरात यांच्याशी विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली.