महात्मा गांधींच्या आदर्श विचारांतून जगामध्ये शांतता नांदेल - सॅम पित्रोदा

संगमनेर Live
0
◻ जयहिंद च्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये १५० देशातील नागरिकांचा सहभाग.

संगमनेर Live | जगामध्ये वाढत चाललेली अशांतता व वर्चस्ववाद हे मानवतेला अत्यंत धोकादायक असून शांततेतूनच सर्वांची प्रगती होत असते. मात्र या शांततेसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या आदर्श विचारांची व तत्वांची जगाला गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व राजकीय विश्‍लेषक पद्मभूषण सॅम पित्रोदा यांनी केले आहे. 

जय हिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समध्ये ते जागतिक शांतता सुसंवाद व प्रगती या विषयावर बोलत होते. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हॉलमध्ये झालेल्या उद्घाटनपर कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून जय हिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आ. डॉ. सुधीर तांबे आंतरराष्ट्रीय समन्वयक उत्तमराव जगधने, संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, समन्वयक उत्कर्षा रुपवते, संदीप खताळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंद, डॉ. एम. ए. व्यंकटेश यांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय ग्लोबल कॉन्फरन्समध्ये १५० देशातील सुमारे ४७ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. 

या चर्चासत्रात बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की, भारत ही संत महात्म्याची भूमी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताला मिळालेले एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सत्य, अहिंसेचा मार्ग दाखवून जगामध्ये शांतता निर्माण करण्याचे काम केले. पहिल्या महायुद्धानंतर या मार्गाचा अवलंब केल्याने जगामध्ये शांतता नांदली. प्रत्येक देशामध्ये गांधीजींचा विचार अतिशय महत्त्वाचा असून शेवटी विजय सत्याचा होतो हे त्यांचे ब्रीद वाक्य प्रत्येकाला प्रेरणा देत असते. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत प्रत्येकानं सजीव सृष्टी, पर्यावरण व आपल्या माणसांची काळजी केली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

दलाई लामा म्हणाले की, प्रत्येक देशाने आपापल्या ताकतीवर प्रगती साधली आहे मात्र या प्रगतीमध्ये वाढलेला वर्चस्ववाद हा काहीसा धोकादायक ठरू शकतो. मात्र संपूर्ण जगाला शांततेचा आणि एकात्मता मंत्र देणारे महात्मा गांधी हे खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय पुरुष होते त्यांच्या विचारांची गरज यापुढेही संपूर्ण जगाला राहणार असल्याचे ते म्हणाले.

 
अमेरीकेचे राजकीय नेते फ्रँक इस्लाम म्हणाले की, महात्मा गांधी यांचा देश असलेल्या भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. महात्मा गांधी हे फक्त एका देशापुरते नसून ते जगाचे आहेत त्यांनी दक्षिण आफ्रिके मधून केलेली सुरुवात भारतामध्ये पोहोचली आणि भारत आज शांततेचा पुरस्कर्ता म्हणून जागतिक पातळीवर उभा आहे. ते सर्व गांधींजींमुळे आहे. त्यांच्या विचारांवर काम करणारी जयहिंद लोकचळवळ नवभारताच्या उभारणीत महत्वाचे योगदान देईल असेही ते म्हणाले. 

जर्मनीच्या क्लॉडिया नोलते म्हणाल्या की, जग आणि महात्मा गांधी हे अतूट नाते आहेत. महात्मा गांधींनी जगाला मानवतेचा मंत्र दिला त्यांच्या विचारांवर संपूर्ण जगामध्ये संशोधन होत असून त्यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे.

या चर्चासत्रामध्ये डॉ. संदीप वासलेकर, खा. कुमार केतकर, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्‍वर येवतकर, जो वेबस्टॉर, थॉमस लॅन्की, क्लावडिया क्रोफॉर्ड, सुरेश द्वादशीवार यांनी एकविसाव्या शतकात गांधीजींच्या विचारांचे महत्त्व या विषयावर आपले मत व्यक्त केले.
 
यावेळी आमदार डॉ. तांबे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जय हिंद लोकं चळवळीचा उद्देश निरोगी समाज व्यवस्थेसाठी करत असलेल्या गोष्टी आणि महात्मा गांधी यांच्या प्रेरणादायी विचारांबाबत असलेल्या ग्लोबल कॉनफरन्स  विषयी माहिती दिली. या सर्व मान्यवरांचे स्वागत व ग्लोबल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्षा रूपवते यांनी केले तर स्नेहा पाटील व डॉ. वैष्णवी कराड यांनीही सहभाग घेतला. आभार प्रदर्शन समन्वयक उत्तमराव जगधने यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !