◻ संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न.
संगमनेर Live | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ व आहिल्याबाई होळकर यांचा वारसा महिला समर्थपणे चालवत असून समाजाला दिशा देण्याचे काम महिलांनी केले आहे. सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील महिला डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, पोलिस यांनी खुप अथक परिश्रम घेतले. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली होवून त्या आज सक्षम झाल्या असल्याचे गौरवौद्गार नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी काढले आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कोविड योध्दा सन्मान सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. जयश्री थोरात, डॉ. शालिनी सचदेव या प्रमुख पाहुण्यासंह उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, शमा शेख, सुहासिनी गुंजाळ, रुपाली औटी, मालतीताई डाके, सुनंदा दिघे, सुमित्रा दिड्डी, मनिषा भळगट, किशोर पवार, राजेंद्र वाकचौरे, गजेंद्र अभंग, नुरमोहम्मद शेख, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, डॉ. सचिन बांगर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणार्या १८८ महिला डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असून त्यांनी आपले कर्तुत्व कामातून दाखवून दिले आहे. आपल्यातील कलागुणांना वाव दिला आहे. विविध कला आत्मसात करुन उच्च शिक्षण घेवून मुली देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत. कोविडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील महिला, सफाई कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी खुप योगदान दिले आहे. संगमनेर शहरातील सफाई कामगार महिलांनी कोरोना काळात कोणतीही तक्रार न करता काम केले. नगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस यांनी ही कोविड काळात खुप उत्तम काम केले आहे. म्हणून आम्ही कर्तव्य म्हणून त्यांचा सन्मान आज करतो आहे.
महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात खुप काम केले गेले. आजही ही लढाई सक्षमपणे सुरु असल्याचे ही त्या यावेळी म्हणाल्या.
डॉ. शालिनी सचदेव म्हणाल्या कि, आपल्या समाजात स्त्री ला शक्ती म्हणून संबोधले जाते. पुरुषापेक्षा स्त्री कमी नाही. महिलांनी कोरोना काळात प्रत्येक क्षेत्रात आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. कोरोना संपलेला नाही तर त्याचा प्रभाव कमी झाला आहे. महिलांनी स्व:ताच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे ही त्या यावेळी म्हणाल्या.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या कि, आजच्या युगात स्त्री स्वताच्या पायावर उभी राहु शकते. स्वताचे निर्णय स्वता घेऊ शकते. अन्यायाविरोधात लढा उभारु शकते हे केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रतिक आहे. २०२० हे वर्ष आपल्यासाठी लढाईमध्येच गेले. कोरोना काळात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलिस यांनी खुप परिश्रम घेतले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे, आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. असे ही त्या यावेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्पा देशमुख, भरत गुंजाळ, उमेश ढोले, रमेश ताजणे, गौरव मंत्री यांनी विशेष परिश्रम घेतले.