संगमनेर Live (शिर्डी) | शिर्डी विमानतळ ते बाह्यवळण रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आणि आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, अभियंता पी. बी. भोसले, अधिक्षक अभियंता एस. डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, जागतिक बॅकेचे एन. एन. राजगुरू, एस. डी. वसईकर एस. आर. वर्पे या प्रमुख अधिकाऱ्याच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत १९५ कोटी रुपयांच्या निधीस हिरवा कंदील मिळाला आहे.
मागील अर्थसंकल्पात राज्य सरकराने शिर्डी आणि परीसरातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी १३५ कोटी रुपये आणि कोऱ्हाळे ते शिर्डी या बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनास ६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
मात्र नगर मनमाड या राज्य मार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात झाल्याने राज्य सरकारने मंजूर केलेला निधी तसाच पडून होता. या मंजूर निधीचा विनियोग व्हावा यासाठी आ. विखे पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिर्डी विमानतळ ते बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे असा प्रस्ताव दिला होता. तसेच भूसंपादनासाठी मंजूर झालेला ६० कोटी रुपयांचा निधीही पुरेसा नसल्याने या निधीचा उपयोगही चौपदरीकरणासाठी करण्यात यावा आशी विनंती आ. विखे यांनी मंत्री चव्हाण यांना केली होती.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री अशोक चव्हाण यांनी या संपूर्ण प्रस्तावाची माहीती आजच्या बैठकीत जाणून घेतली.आ. विखे पाटील यांनी या बाह्यवळण रस्ताच्या रुंदीकरणाच्या संदर्भात काही बाबी निदर्शनास आणून दिल्या. पुर्वी रस्त्यासाठी तसेच भूसंपादनासाठी मंजूर झालेला १९५ कोटी रुपयांचा निधी आता चौपदरीकरणासाठी खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
शिर्डी आणि परीसरातील गावामधील स्थानिक वाहतूक तसेच शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेवून बाह्यवळण रस्ताचे रूंदीकरण होणे अतिशय गरजेचे होते. आता शिर्डीच्या विमानतळाचा मोठा लाभ भाविकांना आणि व्यावसायिकांना होत असल्याने दळणवळणाची गरज लक्षात घेवून या मार्गाचे रूंदीकरणाचा प्रश्नही महत्वपूर्ण होते.
आ. विखे यांच्या प्रस्तावास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यता दिल्याने वाहतुकीसाठी चौपदरीकरणाचा रस्ता विकसीत होईल असा विश्वास आ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. या चौपदरीकरणामुळे शिर्डी आणि परीसरातील गावांच्या विकासासालाही अधिक गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.